Narendra Modi
Narendra Modi

तुम्ही 2024 मध्ये पुन्हा अविश्‍वास ठराव दाखल करा! : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : 'हल्ली तुम्ही देवाच्या दारात जायला लागला आहात. देवाने तुम्हाला इतकी शक्ती द्यायला हवी, की 2024 मध्ये पुन्हा तुम्ही आमच्याविरोधात अविश्‍वास ठराव दाखल करावा', अशी मिश्‍किल टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) केली. 'ज्यांचा स्वत:वरच विश्‍वास नाही, ते सरकारवर काय विश्‍वास ठेवणार', अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांच्या एकीची खिल्ली उडविली. तेलगू देसम पक्षाने मांडलेल्या अविश्‍वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी विरोधकांच्या सर्व टीकेचा समाचार घेतला. 

मोदी म्हणाले, "अविश्‍वास प्रस्ताव हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. टीडीपीच्या माध्यमातून हा प्रस्ताव आला असला, तरीही त्यांच्याबरोबर असलेल्या इतर काही सदस्यांनीही त्यांची भूमिका मांडली आहे. या चर्चेच्या माध्यमातून देशाला या सभागृहातील नकारात्मकतेचा चेहरा पाहायला मिळाला. विकासाप्रति काही जणांना किती तिटकारा आहे, हेही दिसले. 'अविश्‍वास प्रस्ताव आलाच का', असा प्रश्‍न अनेकांना पडला. संख्या नाही, बहुमतही नाही तरीही प्रस्ताव का आला? चर्चेची तयारीच नव्हती, तर मग प्रस्ताव का दाखल केला? पण हे अजाणतेपणी घडलेले आहे किंवा अतिआत्मविश्‍वासामुळे झालेले आहे, असे वाटत नाही. 'अहंकार' हे या मागील कारण आहे. 'मोदी हटाव' हे मुख्य कारण आहे.'' 

'2019 मध्ये तुम्हाला सत्तेत येऊ देणार नाही, असे जोरजोरात ओरडून सांगत आहेत. जे जनतेवर विश्‍वास न ठेवता स्वत:लाच 'भाग्यविधाता' मानत आहेत, त्यांच्याकडून असे वाक्‍य म्हणजे चेष्टाच आहे. 2019 मध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष झाला, तर इतरांचे काय होणार याबाबत जरा गोंधळ आहे. ही भाजपची नाही; कॉंग्रेसच्या मित्रपक्षांची 'फ्लोअर टेस्ट' आहे. कॉंग्रेसला त्यांच्या मित्रांची चाचणी घ्यायचीच असेल, तर त्यासाठी सरकारवरील अविश्‍वास ठरावाचा आधार कशाला घेता? मुद्दा असा आहे, कॉंग्रेसचा सरकारपेक्षा स्वत:च्या मित्रांवरच अधिक अविश्‍वास आहे', असा टोला मोदी यांनी लगावला. 

पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामाचा पाढा वाचत 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीची पायाभरणी केली. सरकारच्या कामाविषयी ते म्हणाले, "'सबका साथ, सबका विकास' या ध्येयाने आमचे सरकार काम करत आहे. देशाच्या 18 हजार गावांमध्ये वीज पोचविण्याचे काम यापूर्वीचे सरकारही करू शकले असते. गरीबांच्या नावाखाली बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाले; पण बॅंकांचा गरीबांना फायदा झाला नाही. 'जन धन योजने'च्या माध्यमातून आम्ही गरीबांना बॅंकेच्या व्यवस्थेत आणले. 'नऊ सिलिंडर की बारा सिलिंडर' या चर्चेमध्येच अडकलेल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य जनतेसाठी काहीच करता आले नाही. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही योजनाबद्ध पावले उचलत आहोत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com