नवी दिल्ली - बारावीच्या अकाऊंटन्सीची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) आज (गुरुवार) स्पष्ट करण्यात आले. तसेच, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवेविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही नोंदविणार असल्याचे मंडळाने सांगितले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सीसोदिया यांनी आज बारावीच्या अकाऊंटन्सीची प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार समजली असल्याचे ट्वीटरवरून सांगितले. तसेच, या प्रकरणी सखोल चौकशी करून तक्रार नोंदविण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी ट्वीटरवर सांगितले. "सीबीएसई'च्या अधिकाऱ्यांनी मात्र प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.
काही समाजकंटकांनी व्हॉट्सऍपवरून याबाबतचा बनावट संदेश पसरविल्याचा दावाही या अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
|