चेन्नई - भारताची "चांद्रयान-2' मोहीम येत्या ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही मोहीम पुढील महिन्यात सुरू होणार होती. मात्र, तज्ज्ञांनी आणखी काही चाचण्या सुचविल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवान यांनी दिली. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचा प्रथमच प्रयत्न केला जाणार आहे.
इस्रो आणि इतर संस्था चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी काही प्रयोग राबवित आहेत. चंद्रावर मानवी वस्तीच्या उद्दिष्टासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे. भारताने याआधी चंद्रावर यान पाठविले आहे. इस्रोकडून आता चांद्रयान-2 प्रकल्पाची तयारी करण्यात येत आहे.
चंद्राच्या कक्षेत (ऑर्बिट) 2020 पर्यंत अवकाश स्थानक बांधण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय पृथ्वीवरुन प्रक्षेपित करण्यात असलेले रेडिओ सिग्नल चंद्राच्या ज्या भागांमध्ये पोहोचू शकत नाहीत, अशा भागांविषयी चीनही संशोधन करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून घेण्यात आलेली ही मोहिम अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.
|