दहशतवादी बहादूर अलीविरोधात आरोपपत्र

bahadur ali
bahadur ali

नवी दिल्ली -  "लष्करे तैयबा'चा संशयित दहशतवादी असलेल्या सैफुल्ला मन्सूर उर्फ बहादूर अली (वय 21) याच्याविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज आरोपपत्र दाखल केले. नवी दिल्लीसह जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

दहशतवादी बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये दगडफेक करणे आणि अशांतता पसरविणे, हे आरोपही बहादूर अलीवर ठेवण्यात आले आहेत. "एनआयए'ने भारतीय दंडविधान, बेकायदा कारवायाविरोधी कायदा, स्फोटकेविरोधी कायदा, शस्त्रकायदा, परकी नागरिक कायदा आणि भारतीय बिनतारी दूरसंचार कायदा अशा विविध कायद्याअंतर्गत तरतूदींअन्वये आरोपपत्र दाखल केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्‍मीरमधील अशांततेला पाकिस्तानस्थित लष्करे तैयबा ही दहशतवादी संघटना कारणीभूत असल्याचा दावा आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे.

"एनआयए'च्या दाव्यानुसार, गेल्या वर्षीपासून लष्करे तैयबाने पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने भारतामध्ये अनेक दहशतवादी घुसविले असून, नागरिकांमध्ये मिसळून अशांतता पसरविणे, जवान-पोलिसांवर हल्ले करणे असे लक्ष्य त्यांना देण्यात आले होते. पाकिस्तानमधील विविध भागातील युवकांची दिशाभूल करत लष्करे तैयबाने त्यांना भारताविरोधात युद्ध करण्यास चिथावणी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बहादूर अलीने भारताच्या सार्वभौमतेला आव्हान देण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचा कटही रचल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवरून घुसखोरी केल्यानंतर अली आणि त्याचे सहकारी सात दिवस कोणाच्याही नजरेला न पडता चालत 20 जूनला भारतात आले, ही सुरक्षा यंत्रणेतील त्रुटीही "एनआयए'ने आरोपपत्रात निदर्शनास आणून दिली आहे. बहादूर अलीकडे सापडलेल्या डायरीमध्ये नवी दिल्लीसह जम्मू आणि काश्‍मीरमधील अनेक प्रमुख शहरांची नावे होती. अलीचा पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये झालेल्या संवादाची आणि त्याने दिलेल्या कबुलीची माहिती आरोपपत्रात देण्यात आली आहे. न्यायालयाने 19 डिसेंबरला झालेल्या सुनावणी वेळी बहादूर अलीला 18 जानेवारीपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अलीने दिली कबुली
बहादूर अलीला गेल्या वर्षी 24 जुलैला जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अटक करण्यात आली होती. आपण पाकिस्तानी नागरिक असल्याचे आणि पाकिस्तानातच दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याने कबूल केले आहे. शाळा सोडून दिलेला अली हा लाहोरमधील रायविंद गावातील रहिवासी आहे. अलीने अबू साद आणि अबू दर्दा या दोन सहकाऱ्यांबरोबर घुसखोरी केल्यानंतर आपल्याला पाकव्याप्त काश्‍मीरमधून नियमितपणे बिनतारी यंत्रणेद्वारे मार्गदर्शन मिळत होते, असेही त्याने कबूल केले आहे. यासाठी त्याला जीपीएस यंत्रणाही पुरविण्यात आली होती. गेल्या वर्षी 24 जुलैला इतर घुसखोरांना मार्गदर्शन करण्याकरिता अली जात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com