नवी दिल्ली : मतदान सक्तीचे करण्यासाठी एकमत होण्याची आवश्यकता असल्याचे मत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केले. एखाद्या माणसाने मतदान न केल्यास त्याला सरकारला दोष देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले असून त्याच्याशीही मी सहमत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
मतदान करणे हा नागरिकांचा केवळ हक्क नसून ती त्यांची जबाबदारी असल्याचे मत नायडू यांनी व्यक्त केले. तसेच लोकांनी मताधिकाराचा वापर करण्यास तत्पर असायला हवे असेही ते म्हणाले. जर तुम्हाला उमेदवारांपैकी कोणालाही मतदान करायचे नसेल तर तुम्ही त्या सर्वांच्या विरोधात मतदान करू शकता यासाठी "नोटा' ही सुविधा देण्यात आली आहे त्याचा वापर करावा, असे त्यांनी या वेळी सांगितले.
नायडू म्हणाले, "लोकांचे विचार भिन्न असल्याने लोकशाहीमध्ये मतदान सक्तीचे करणे ही एक सूचना आहे, हे करण्यासाठी घटनेत बदल करण्याची आणि संसदेच्या मान्यतेचीही गरज आहे. त्यामुळे तिच्या अंमलबजावणीस मोठा अवधी लागेल. तोपर्यंत लोकांमध्ये जनजागृती करता येऊ शकते, यासाठी निवडणूक आयोगदेखील शक्य त्या सर्व उपाययोजना राबवित आहे.''
|