नवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून, देशाचा विकास वेगाने होत आहे. याचे कौतुक सगळ्यांकडूनच होत आहे'', असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (मंगळवार) केले. तसेच आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांशी संवाद साधताना राष्ट्रपती कोविंद यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ''देशाच्या जडणघडणीत देशातील प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या समाजात महिलांची विशेष भूमिका आहे. महिलांना व्यापक स्वातंत्र्य मिळाल्यास देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे सार्थक होईल. कुटुंबातील माता-बहिणींना आणि मुलींना घरात आणि घराबाहेरील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. महिलांना त्यांच्या क्षमतांचा विकास आणि वापर करण्याची संधी द्यायला हवी. महिलांना सुरक्षित वातावरण आणि विकासाच्या संधी मिळायला हव्यात'', असेही राष्ट्रपतींनी सांगितले.
दरम्यान, महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाचा विशेष उल्लेखही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ''महात्मा गांधींना जगात मोठा सन्मान दिला जातो. संपूर्ण जग त्यांचा आदर करते. त्यांचे आदर्श आपण समजून घ्यायला हवेत. गांधीजींनी स्वच्छता अभियानाची सुरवात केली होती. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेला प्राधान्य दिले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.