नवी दिल्ली : केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या गंगा शुद्धीकरणाच्या प्रकल्पावर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पुन्हा एकदा कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सध्या गंगेची अवस्था खूपच वाईट झाली असून, तिला स्वच्छ करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी खंत "एनजीटी'चे अध्यक्ष न्या. ए. के. गोयल यांनी व्यक्त केली आहे.
सध्या गंगा पुनरुज्जीवनासाठी होणारे प्रयत्न अपुरे असून, या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी या कामावर नियमितपणे देखरेख ठेवली जाणे आवश्यक असल्याचे न्या. गोयल यांनी नमूद केले. या वेळी लवादाने सामान्य माणसांची मते जाणून घेण्यासाठी सरकारला सर्वेक्षण करण्याचेही आदेश दिले. गंगेतील प्रदूषणाबद्दल सामान्य लोकांना काय वाटते, हे जाणून घ्या. याबाबत ई मेलच्या माध्यमातून त्याचा फीडबॅक घेता येईल असेही लवादाने त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
संरक्षणात अपयश
गंगा ही देशातील प्रतिष्ठित नदी असून देशातील शंभर कोटी जनता या नदीचा सन्मान करते; पण तिचे संरक्षण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. तिच्या संरक्षणासाठीची यंत्रणा अधिक मजबूत आणि प्रभावी बनवा, सरकारने गंगा शुद्धीकरणावर दोन वर्षांत सात हजार कोटी रुपये खर्च केले असले तरीसुद्धा ही नदी अद्याप शुद्ध होऊ शकलेली नाही, असे निरीक्षणही न्या. जावेद रहीम आणि न्या. आर. एस. राठोड यांच्या खंडपीठाने नोंदविले. याआधीही हरित लवादाने गंगा शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.