इंदूर - मध्य प्रदेश राज्यामधील मंदसोर जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आज (मंगळवार) तीव्र पडसाद उमटले. संतप्त शेतकऱ्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल व पोलिस दलावर दगडफेक केल्यानंतर शहरभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सीआरपीएफकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये दोन मृत्युमुखी; तर दोन जखमी झाले. मात्र राज्याचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सीआरपीएफकडून गोळीबार करण्यात न आल्याचा दावा केला आहे.
येथील मंदसोर-नीमच रस्त्यावर आज सुमारे हजारभर शेतकऱ्यांनी चक्काजाम केला. यानंतर 8 ट्रक व दोन दुचाकींना आग लावण्यात आली. मंदसोर येथे कालपासूनच (सोमवार) इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर, मृत नागरिकांस प्रत्येकी दोन लाख रुपये; तर जखींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमधील या शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार देशभरामधील शेतकऱ्यांबरोबर युद्ध खेळत असल्याचा टोला गांधी लगावला आहे.
|