जनतेला आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात रस नसतो : पर्रीकर

manohar parrikar
manohar parrikar

पणजी: जनतेला आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात कधीच रस नसतो. जनतेला विकास हवा असतो. त्यासाठी सक्षम नेतृत्व हवे, हेही जनता जाणते. त्यामुळे भाजपचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी जनतेने विजयी केले. हा विजय आम्हाला अपेक्षितच होता, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे "सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना सांगितले. विजयी घोषित झाल्यानंतर ते लगेच भाजपच्या कार्यालयाकडे निघाले. या दरम्यान त्यांच्याशी झालेला संवाद.

-मिळालेल्या मताधिक्‍याने समाधानी आहात?
पर्रीकर ः
मताधिक्‍य अपेक्षितच होते. मी कधीही 7-8 हजार मताधिक्‍य मिळेल असे म्हटले नव्हते. प्रचारावेळी काही आकडे सांगितले जातात. तो प्रचारतंत्राचा भाग असतो. प्रचारावेळी अनेक जण बोलत असतात. त्यामुळे मी अपेक्षित धरलेले मताधिक्‍य मला मिळाले, असे मला वाटते. समाधानी म्हणाल तर मला विजय अपेक्षितच असल्याने त्यात आणखी समाधानी होण्याची बाब ती कोणती?

-निकालानंतर सरकारचे स्थैर्य वाढले असे वाटते का?
पर्रीकर ः
सरकार स्थिर होते व राहील. हा प्रश्‍न स्थैर्याचा नव्हता. मी संरक्षणमंत्रिपदी होतो. पक्षाने मला तेथे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नेले होते. पक्षानेच मला परत मुख्यमंत्रिपदी पाठवले. मागच्या खेपेला हाती घेतलेली अनेक कामे नंतरच्या काळात पूर्ण झालेली नव्हती. ती पूर्ण करण्यासाठी हुरूप यावा लागतो. मला वाटते, आजच्या निकालाने मला तो हुरूप पुन्हा मिळवून दिला आहे.

- निवडणूक काळात तुमच्याविरोधात मोठा प्रचार झाला.
पर्रीकर ः
मी पणजीतील भाजपचा उमेदवार होतो आणि मुख्यमंत्रीही होतो. त्यामुळे डोक्‍यावर बर्फ ठेवून काम करत होतो. संयम बाळगत होतो. संरक्षणमंत्रिपदी वावरताना तोंड बंद कसे ठेवावे, याचे शिक्षण मला नकळतपणे मिळाले होते. त्याचा वापर केला. मला ठाऊक होते, की जनता अशा अपप्रचाराला जराही थारा देणार नाही. तेच आज दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com