भारताने अण्वस्त्र धोरण बदलले का?

भारताने अण्वस्त्र धोरण बदलले का?

नवी दिल्ली : अण्वस्त्रांबाबत भारताच्या "नो फर्स्ट यूज' या धोरणावर देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी आश्‍चर्य व्यक्त करून त्याच्या विरोधात मत नोंदविल्याने भारताच्या अनेक दशकांच्या धोरणात मोदी सरकारने बदल केला आहे का, असा सवाल राज्यसभेत आज विचारण्यात आला. भारतीय लष्कराने केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक'चे श्रेय संघाच्या विचारसरणीला असल्याच्या पर्रीकराच्या वक्तव्यावरही हा सैनिकांचा अवमान असल्याचे विरोधी नेत्यांनी सांगितले.


भारताने अण्विक शक्तीबाबत जागतिक सहमती ठरावावार केलेल्या स्वाक्षरी धोरणाच्या विपरीत पर्रीकरांची वक्तव्ये असल्याचाही आरोप विरोधी सदस्यांनी केला. या वेळी सभागृहात उपस्थित असलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यावर गप्प राहण्याचे धोरण स्वीकारल्याने याबद्दलचा संशय वाढल्याचे मत राज्यसभेत व्यक्त झाले.


कॉंग्रेसचे शांताराम नाईक यांनी विशेषोल्लेखाद्वारे मांडलेल्या या मुद्यावर कॉंग्रेसचे आनंद शर्मा व जदयूचे शरद यादव यांनीही पर्रीकर यांनी भूमिका मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र संरक्षणमंत्री अखेरपर्यंत बोललेच नाहीत. नाईक म्हणाले, की निवृत्त ब्रिगेडियर गुरुमित कंवल यांच्या न्यू अर्थशास्त्र... या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात पर्रीकरांनी सांगितले, की आम्ही अण्वस्त्रे प्रथम वापरणार नाही, असे भारताकडून सांगितले जाते तेव्हा मला आश्‍चर्य वाटते. कारण हे म्हणण्यापेक्षा भारताने ""आम्ही एक जबाबदार अण्विक शक्ती आहोत व जबाबदारीनेच तिचा वापर करू,'' असे म्हटले पाहिजे. भारत अण्वस्त्रे प्रथम वापरणार नाही या भारत सरकारच्या धोरणाशी हे विसंगत आहे. खुद्द संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्यातूनही विपर्यास दिसतो. कारण मोदी सरकारने नो फर्स्ट यूजचे धोरण बदलले असेल तर पाकिस्तानच्या पथकाला पठाणकोटच्या हवाई तळावर शिरकाव करण्यास परवानगी कशी देण्यात आली? अण्विक धोरणाबाबत संसेबाहेर वक्तव्ये करणे गैर आहे. यापूर्वी सर्जिकल स्ट्राइकबाबत बोलताना पर्रीकर यांनी संघाला त्याचे श्रेय दिले व हा शूरवीर जवानांचा अपमान आहे, असेही नाईक म्हणाले.
यादव व शर्मा यांनीही त्यांच्या मताशी सहमती दर्शवत अण्विक धोरणात मोदी सरकारने बदल केला का, असा सवाल केला.

जया बच्चन यांनी खडसावले
समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना पद्मावती चित्रपटादरम्यान झालेल्या मारहाणीबाबत संताप व्यक्त केला. त्या बोलत असताना आनंद शर्मा शेजारच्या सदस्यांशी काही बोलत असल्याचे पाहून बच्चन यांनी, "शर्मा तुम्ही बोलू नका कारण मला अडथळा होतो,' असे जाहीरपणे सुनावले. सभागृहाचे संचलन करणे हा पीठासीन अधिकाऱ्यांचा सर्वाधिकार असला तरी बच्चन यांनी शर्मा यांचे जाहीर कान उपटल्यावरही उपसभापती पी. जे. कुरियन शांतच राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com