कोटकपुरा : कॉंग्रेसने पंजाबमधील तरुणांना आधीच दहशतवादी ठरविले असून, आता आम आदमी पक्ष त्यांना नशेखोर ठरवू लागला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधी दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित सभेत बोलताना लगावला.
पंजाबच्या भवितव्याशी संपूर्ण देशाचे भवितव्य जोडले गेले असून, पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या या राज्यामध्ये संरक्षणाची भिस्त अधिक सक्षमपणे सांभाळणारे सरकार हवे आहे. येथे जर ऐषआराम करणारे सरकार आले तर देशाची सुरक्षितता धोक्यात सापडू शकते. पाकिस्तान सध्या भारतात घुसखोरी करण्याची संधी शोधत असल्याचे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये 20 मिनिटे केवळ शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टींवर चर्चा केली. राजकीय क्षेत्रामध्ये वाढत जाणाऱ्या कटुतेवरही मोदी यांनी भाष्य केले. मागील अनेक वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहे; पण प्रकाशसिंग बादल आणि अटलबिहारी वाजपेयी हे असे दोन नेते आहेत, ज्यांनी कधीही कोणाबद्दल अनुद्गार काढल्याचे मी ऐकिवात नाही; पण काही मंडळी प्रकाशसिंग यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत बोलत आहेत. अर्थात, ज्यांनी अण्णा हजारेंना धोका दिला त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार, असेही मोदी यांनी नमूद केले.
|