मोदी राज्यसभेत; पण गोंधळ कायम 

narendra-modi
narendra-modi

नवी दिल्ली - नोटाबंदीवर राज्यसभेतील चर्चा गेला आठवडाभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावे, यासाठी रोखणाऱ्या कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आज पंतप्रधान आले, तरी ही चर्चा होऊ दिली नाही. नोटाबंदीवर संसदेबाहेर विरोधकांवर काळा पैसा दडविल्याचा सर्रास आरोप करणाऱ्या मोदींनी माफी मागावी, अशी मागणी पुढे करून विरोधकांनी घातलेला गोंधळ तटस्थपणे पाहत पंतप्रधान सुमारे तासभर सभागृहात थांबले व नंतर निघून गेले. दुपारी दोनलाही मोदी पुन्हा सभागृहात आले, थांबले व कामकाज तहकूब होताच निघून गेले. 

सरकार अल्पमातत असलेल्या राज्यसभेत दर गुरुवारी तासभरासाठी पंतप्रधान येतात. प्रश्‍नोत्तराच्या तासाला ते बसतात. मात्र हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीवरून विरोधक एकवटल्याने राज्यसभा चालणे अशक्‍य झाले आहे. आज पंतप्रधान आले, तरी विरोधकांनी चर्चा घडवली नाही, याबद्दल माहिती आणि प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले; मात्र हा गोंधळ चालू राहिला तरी सारी महत्त्वाची विधेयके निश्‍चित मंजूर होतील, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्ष हमीद अन्सारी आज सुरवातीला प्रश्‍नोत्तराच्या तासात चर्चा घेण्यास अनुकूल नव्हते; मात्र सभागृहातील बहुमताचा अंदाज घेऊन (सेन्स ऑफ द हाउस) त्यांनी चर्चा सुरू केली. के. पी. सिंगदेव यांचे नावही पुकारले. एवढ्यात कॉंग्रेस सदस्य "नरेंद्र मोदी माफी मॉंगो,' अशा घोषणा देत पुढे आले व कामकाज चालण्याची शक्‍यता संपली. आपण माफी मागवी, यासाठीची ही घोषणाबाजी मोदी शांतपणे पाहत होते. यादरम्यान विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, बसपच्या मायावती व तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी नोटाबंदीवर पंतप्रधानांनी संसदेबाहेर वक्तव्ये केली; मात्र ते संसदेला टाळत असल्याचा ठपका ठेवला व त्यांनी सभागृहात बोलावे, अशी मागणी केली. नायडू यांनी दुसऱ्याच क्षणी उठून पंतप्रधान चर्चेत निश्‍चित हस्तक्षेप करतील, असे सांगितले. त्यावर कॉंग्रेसने माफीच्या घोषणा पुढे केल्या. आझाद म्हणाले, की मागील आठवड्यात पंतप्रधान सभागृहात आले आणि गेले 15 दिवस विरोधकांनी हीच मागणी केली आहे, की त्यांनी सभागृहात थांबावे. नोटाबंदीचा निर्णय सरकारने तयारी न करताच घेतल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. रांगांत ताटकळत थांबलेल्या किमान 82 लोकांचा मृत्यू आला आहे. यासाठी जबाबदार कोण आहे; मात्र सरकारच्या विरोधात काहीही बोलले तरी त्याला देशविरोधीच ठरविले जाते, ही गेली दोन वर्षे फॅशनच झाली आहे. सामान्य जनतेचा आवाज संसदेत मांडणारे आम्ही सारे विरोधक देशविरोधी आहोत का? पंतप्रधानांनी संसदेबाहेर सांगितले, की विरोधक काळ्या पैशेवाल्यांना पाठिंबा देतात, हे विधान अतिशय गंभीर आहे. हे विधान पंतप्रधानांनी कोणत्या आधारावर केले, हे सभागृहाला सांगितले पाहिजे. 

विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. 

- वेंकय्या नायडू, माहिती आणि प्रसारण मंत्री 

सामान्य जनतेचा आवाज संसदेत मांडणारे आम्ही सारे विरोधक देशविरोधी आहोत का? 

- गुलाम नबी आझाद, विरोधी पक्ष नेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com