नवी दिल्ली - "राष्ट्रवादा'संदर्भात देशात सध्या सुरु असलेल्या वादामध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही उडी घेत "राष्ट्रवाद हा केवळ या देशात वाईट शब्द मानला जातो,' असे सूचक मत व्यक्त केले आहे.
"राष्ट्रवाद हा चांगला शब्द आहे. मात्र केवळ याच देशात राष्ट्रवाद हा वाईट शब्द मानला जातो,'' असे जेटली म्हणाले. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही यासंदर्भात मत व्यक्त करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कायद्याच्या कक्षेत असावे, असे प्रतिपादन केले होते. परंतु, पर्रीकर यांच्या या विधानावर कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत कायद्याच्या कक्षा कोण ठरविणार, अशी विचारणा केली होती. मंत्र्यांची इच्छा म्हणजे कायद्याची कक्षा असू नये; तर राज्यघटनेद्वारे या कक्षा निश्चित करण्यात याव्यात, असे येचुरी म्हणाले होते.
राष्ट्रवाद व अभिव्यक्तीस्वातंत्र्याविषयीच्या या वादास आता राजकीय वळण मिळाले असून विविध राजकीय नेत्यांनी यासंदर्भात मतप्रदर्शन केले आहे. या पार्श्वभूमीवर, जेटलींचे मत अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.
|