चर्चा आणि वादविवाद लोकशाहीसाठी पोषक: वेंकय्या नायडू

चर्चा आणि वादविवाद लोकशाहीसाठी पोषक: वेंकय्या नायडू

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था आणि जीएसटीवर देशभरात होत असलेली चर्चा चांगली असून अशा प्रकारच्या चर्चा आणि सल्लामसलती लोकशाहीसाठी पोषक आहेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज केले. भविष्यकाळात जीएसटी सर्वांनाच फायदेशीर असेल, असा विश्‍वासही नायडू यांनी व्यक्त केला.

रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावर आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपराष्ट्रपती नायडू यांचे आज भाषण झाले. "देशाबाबत, देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि जीएसटीचे परिणाम, दुष्परिणाम यांबाबत देशभरात चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. अशी चर्चा कायम सुरू राहिली पाहिजे. हे लोकशाहीसाठी चांगले आहे,' असे ते या वेळी म्हणाले. कोणतेही स्थित्यंतर घडून येत असताना सुरवातीला काही अडचणी, संकटे येतच असतात हे नागरिकांनी कृपया समजून घ्यावे. परंतु अंतिमत:, पंतप्रधानांच्या सुधारणा, अंमलबजावणी आणि परिवर्तन या मंत्राला काही एक अर्थ आहे, असे नायडू म्हणाले. जीएसटीवरील राजकीय चर्चेला सरकारने वाव द्यावा आणि या चर्चांमधील सकारात्मक मुद्‌द्‌यांची दखल घेत योग्य ते बदल करावेत, असा सल्लाही उपराष्ट्रपतींनी सरकारला दिला.

"जीएसटी'ला पाठिंबा दर्शविताना नायडू यांनी विविध माध्यमांमधील वृत्तांचा दाखलाही दिला. जागतिक बॅंक आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही जीएसटीचा मार्ग मान्य केला असून भारतीयांच्या भावी पिढ्या या कररचनेवर खूश असतील, असा विश्‍वास नायडू यांनी व्यक्त केला. पायाभत सुविधांमध्ये आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जीएसटीची अंमलबजावणी यामुळे भारतीय रेल्वेला लवकरच फायदा होईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com