राजीनामा देणार नाही : मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

manohar lal khattar
manohar lal khattar

हरियाना, पंजाबमधील जनजीवन सुरळीत

नवी दिल्ली: हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज राजीनाम्याची शक्‍यता फेटाळून लावली. राज्यातील परिस्थिती सरकारने संयमाने हाताळली असून, त्याबाबत आपण समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले.

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम सिंगच्या अटकेनंतर हरियानात उसळलेल्या हिंसाचारामुळे खट्टर यांच्यावर जोरदार टीका झाली होती. या हिंसाचारात 38 जणांचा बळी गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर खट्टर यांनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली व त्यांना अहवाल सादर केला.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खट्टर म्हणाले,""सरकारने सुरवातीला परिस्थिती संयमाने हाताळली. राम रहीम प्रथम न्यायालयापुढे हजर व्हावा, हे सरकारचे पहिले लक्ष्य होते. पंचकुला येथे जमलेल्या लाखो लोकांवर आधीच कारवाई केली असती तर त्याचे निमित्त पुढे करून राम रहीम 25 ऑगस्टला न्यायालयापुढे उपस्थित झाला नसता. त्यामुळे कोणी काहीही म्हणा,आम्ही आमच्या कामाबद्दल समाधानी आहोत. त्यामुळेच नेतृत्वात बदल होणार नाही.''

राजकीय लाभासाठी भाजप त्याची मदत घेत होता, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""राजकीय पक्ष सर्वांचीच मदत घेत असतात; पण कायदा मोडण्याचा अधिकार कोणाला नाही. कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही.''

दरम्यान, हरियाना व पंजाबमधील जनजीवन आता सुरळीत झाले आहे. दुकाने व शैक्षणिक संस्था पूर्ववत सुरू झाल्या असून संवेदनशील भागातील वाहतूकही सुरळीत झाली आहे. राम रहीमला रोहतक जिल्ह्यातील सिनरिया कारागृहात ठेवले आहे. या कारागृहाभोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. हरियानात आता केवळ सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com