महिलांच्या सुरक्षेसाठी "पॅनिक बटण'

महिलांच्या सुरक्षेसाठी "पॅनिक बटण'

मोबाईलमध्ये येणार नवी यंत्रणा; उपग्रहामार्फत मिळणार संकटाचा संदेश
नवी दिल्ली - भारतात विकल्या जाणाऱ्या किमान 50 टक्‍के मोबाईल हॅंडसेटमध्ये संकटकाळी दाबता येईल, असे "पॅनिक बटण' लावण्याची अट कंपन्यांना घातली जाणार आहे. नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या हातात "पॅनिक बटण' असणारा मोबाईल असावा, यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाने महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.

भारतात महिला वापरत असलेल्या मोबाईलची निश्‍चित संख्या शोधण्यासाठी हॅंडसेट विक्रीचे आकडे; तसेच सेवा पुरवठादारांकडे नोंद असलेल्या महिला ग्राहकांची संख्या एकत्रित करण्यात आली आहे.

भारतातील मोबाईलधारकांमध्ये 40 टक्‍के महिला आहेत असा निष्कर्ष प्रारंभिक पाहणीतून निघाला आहे. मोबाईल कंपन्यांशी या संदर्भात चर्चा झाली असून, यंत्रात "पॅनिक बटण'साठी काय बदल करता येतील याची आखणी सुरू आहे. यंत्रात हे तंत्रबदल लागू होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एखादी महिला संकटात असेल तर तिच्या अवतीभवतीच्या परिसरात वावरणाऱ्या दहा जणांना तिला मदतीची गरज असल्याचे संकेत देणारे ऍप विकसित होत असून, ते प्रत्येक महिलेला नि:शुल्क वापरता येणार आहे.

देशातील प्रत्येक महिलेच्या हाती असलेल्या स्मार्टफोनवर हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल. स्मार्टफोन न वापरणाऱ्या महिलांपर्यंत सुरक्षा जाळे पोचवण्याची यंत्रणा उपग्रहाच्या माध्यमातून विकसित होईल काय, याचाही शोध घेतला जातो आहे.

दिल्लीत काही वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया बलात्कार आणि निर्घृण हत्येनंतर महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी याच शूर; पण अभागी ठरलेल्या तरुणीच्या नावाने निधी उभारला गेला आहे. या निर्भया निधीचा वापर होत नसल्याची तक्रार महिला संघटनांनी केली आहे. निधी पडून राहण्यामागची कारणे काय असे विचारला असता, केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री मेनका गांधी म्हणाल्या, की अवास्तव आणि अयोग्य गोष्टींवर निधी खर्च करण्याचे प्रस्ताव सातत्याने पाठवले गेले. प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही लावण्यासारख्या खर्चिक आणि महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी फारच प्रतिकात्मक असलेल्या उपाययोजना त्यात सुचवल्या होत्या. त्या मान्य करणे म्हणजे पैसा फुकट घालवणे होते. त्यामुळे आता अत्यंत परिणामकारक उपाययोजना आम्ही शोधून काढल्या आहेत.

त्यानुसार "पॅनिक बटण'ची तरतूद, आजूबाजूला असलेल्या दहा लोकांना महिला संकटात असल्याचा इशारा उपग्रहामार्फत पोचवला जाणार आहे.

प्रत्येक बसमध्ये सेन्सर
महिलांवर होणारे गुन्हे हे प्रवासादरम्यान वाढतात हे लक्षात घेत आता प्रत्येक बसगाडीत महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागा वाढवून त्यावर "पॅनिक बटण' देण्यात येणार आहे. महिला धावत बसमध्ये चढत असताना कोणताही मुलाहिजा न बाळगता बसची घंटी वाजवून ती पुढे पिटाळण्याच्या भारतीय सवयीवर मात करण्यासाठी प्रवासी बसमध्ये चढला आहे काय हे पाहून तसे संकेत देणारे सेन्सर लावले जाणार आहेत. केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाने केलेली ही विनंती आपण मान्य केली असून, यापुढे प्रत्येक बसमध्ये असे सेन्सर असतील ही माहिती केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

महिलांसाठी थांबागृह
पाश्‍चात्त्य देशांपेक्षा भारतात होणारे बलात्काराचे प्रमाण कमी आहे. तरीही माध्यमांमुळे भारताची नाहक बदनामी होत असल्याची खंत मेनका गांधी यांनी व्यक्‍त केली. अर्थात नोंदवल्या गेलेल्या तक्रारी आणि गुन्हे यांच्या तपासाला वेग देणे भारतासाठी आवश्‍यक आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेत किमान 33 टक्‍के महिला असाव्यात, याबाबत महिला मंत्रालय आग्रही आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी एक थांबागृह (वन स्टॉप सेंटर) असावे, घरेलू अन्यायग्रस्त महिलांनाही या केंद्रात मायेची पाखर मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com