लखनौ - अलाहाबादला 2019 मध्ये होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यापूर्वी गंगेमध्ये पडणारा कचरा आणि दूषित पाणी रोखण्याच्या दृष्टीने मोठा कृती आराखडा आखल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (मंगळवार) सांगितले.
इशा फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये आदित्यनाथ यांनी गंगा शुद्धीकरणाबाबत सुरू असलेल्या कामाची माहिती सांगितली. "प्रयागला (अलाहाबाद) दोन वर्षांनंतर होणाऱ्या अर्धकुंभमेळ्यापूर्वी एकही नाला अथवा कचरा गंगेच्या पाण्यात पडणार नाही. यासाठी मोठा कृती आराखडा आखण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "नमामि गंगे' प्रकल्पाअंतर्गत तीस हजार कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून, याअंतर्गत गंगा आणि तिच्या उपनद्या कायम प्रवाही आणि स्वच्छ करणार आहे,' असे आदित्यनाथ म्हणाले. या दोन वर्षांमध्ये कोणालाही गंगेमध्ये घाण टाकू दिली जाणार नाही. ठिकठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून दूषित पाणी शुद्ध करूनच नदीत सोडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नदीकिनारी असलेली सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही आल्याचे आदित्यनाथ यांनी आवर्जून सांगितले.
|