रेल्वे होणार अधिक पर्यावरणस्नेही- प्रभू

रेल्वे होणार अधिक पर्यावरणस्नेही- प्रभू

अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून जास्तीत जास्त वीज घेणार

नवी दिल्ली: रेल्वेसाठी लागणारी वीज अधिकाधिक प्रमाणात अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून मिळविण्याच्या योजनेला रेल्वेने गती दिली असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण रक्षण यंत्रणेबरोबर रेल्वेने कालच याबाबतचा करार केला आहे. ही माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज राज्यसभेत दिली. रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधेचा दुरुपयोग होत असल्याचा आक्षेप नाकारताना त्यांनी, अनेक ठिकाणी आसपासचे गरीब विद्यार्थी वाय फाय सेवेचा लाभ घेतात असे सांगितले.

विजेपोटी रेल्वेला दरवर्षी तब्बल 41 हजार कोटी रुपयांचे बिल भरावे लागते, ते कमी करण्यासाठी अपारंपरिक स्रोतांद्वारे सौरऊर्जा, पवनऊर्जा यांची निर्मिती करणे, एलईडी बल्बचा वापर स्थानके, रेल्वे कचेऱ्या व इतरत्र जास्तीत जास्त करणे, वीज वापराचे रेल्वेअंतर्गत लेखापरीक्षण आदी उपाययोजनाही सुरू केल्याचे प्रभू म्हणाले. काही नॅरोगेज मार्गांवरील गाड्या प्रवासी तासांच्या काही काळ सौरऊर्जेद्वारे चालविण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ब्रॉडगेज व त्यातही वातानुकूलित गाड्यांसाठी फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे एका तासाला किमान 30 किलोवॉट वीज लागते. सौरऊर्जेतून एका ठिकाणी सध्या चार किलोवॉट ऊर्जानिर्मिती होऊ शकते. हे प्रमाण वाढविण्याचे प्रयोग यशस्वी ठरल्यावर त्याबाबत विचार केला जाईल. सध्या एक हजार मेगावॉट सौरऊर्जानिर्मिती रेल्वेद्वारे केली जात असून, हे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अपारंपरिक स्रोतांद्वारे 643 ठिकाणी वीजनिर्मिती केली जाणार आहे.

प्रभू म्हणाले, की देशातील 400 मोठ्या रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्यातील 117 स्थानकांवर ती सुरूही झाली आहे. "रेल टेली कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' या स्वायत्त संस्थेकडे हे काम आहे. ही सुविधा जगातील उत्तम व वेगवान इंटरनेट सुविधांपैकी एक असल्याचे प्रमाणपत्रही "गुगल'ने दिले आहे. या वाय-फाय सुविधेचा दुरुपयोग होत असल्याचे दिसत नाही. अनेक ठिकाणी त्या त्या शहरांतील गरीब विद्यार्थी याचा लाभ घेतात. मात्र मोफत वाय-फायवरून लोकांनी आक्षेपार्ह संकेतस्थळे बघू नयेत त्यासाठी ती ब्लॉक केल्याचेही ते म्हणाले.

खाद्यविविधतेचा अनुभव
रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती देताना प्रभू म्हणाले, की अहमदाबाद राजधानी एक्‍स्प्रेसमधील खाद्यपदार्थांबाबत प्रचंड तक्रारी आल्यावर गुजरातमधील संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले गेले आहे. प्रवाशांना स्वच्छ व गरम जेवण मिळावे व त्या कारणावरून प्रवाशांचे डोके गरम होऊ नये यासाठी तक्रारींची हेल्पलाइन, ई-केटरिंगचा विस्तार आदी उपाय सुरू केले आहेत. देशभरासाठी जेवणात केवळ पनीरचे पदार्थ देण्याऐवजी रेल्वे जाईल त्या त्या भागातील पदार्थ प्रवाशांना मिळावेत व भारतातील खाद्यविविधतेचा अनुभव प्रवाशांना मिळावा यासाठी एक योजना कोकण रेल्वेमार्गावर नुकतीच सुरू केली आहे. कोकणातील काही महिला स्वयंसहायता गटांकडे जेवणाचे कंत्राट देण्यात आले व प्रवासी या बदलावर खूश आहेत, असेही प्रभू म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com