जयपूर : विजनवासात असलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज सबलीकरणाचे माध्यम म्हणून समान नागरी कायद्याचा जोरदार समर्थन केले. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली.
नसरीन यांच्या "अचानक' ठरलेल्या भाषणात त्या म्हणाल्या,""मुस्लिम समाजाने अधिक सहिष्णु होणे आणि टीका सहन करणे आवश्यक असून, त्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही. मानवाधिकारांचा पूर्ण फायदा मिळून समाज सबल होण्यासाठी समान नागरी कायद्याची तातडीने आवश्यकता आहे. मी राष्ट्रवाद आणि धार्मिक कट्टरतावाद मानत नाही. एकत्रित जगावर माझा विश्वास आहे. अधिकार, स्वातंत्र्य, मानवता आणि तर्कशुद्धता यावर माझा विश्वास आहे.
इस्लाम जोपर्यंत टीका मान्य करत नाही, तोपर्यंत कोणताही इस्लामिक देश धर्मनिरपेक्ष समजला जाणार नाही. मी टीका केली की लोक मला जीवे मारायला उठतात.'' केवळ मुस्लिम मते मिळविण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा आधार घेणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आपल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही हल्ले केले आहेत आणि आतापर्यंत कोणालाही शिक्षा झालेली नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
नसरीन यांच्या उपस्थितीने चिडलेल्या विविध मुस्लिम संघटनांनी महोत्सवाच्या ठिकाणी निदर्शने केली. यानंतर या संघटनांनी महोत्सवाच्या आयोजकांची भेट घेऊन पुन्हा नसरीन यांना न बोलाविण्याची त्यांच्याकडून हमी घेतली. नसरीन यांची मते परंपरावादी मुस्लिमांना न पटल्याने त्या 1994 पासून विजनवासात आहेत.
|