हैदराबाद - कालेश्वरम सिंचन प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तेलंगणसंदर्भातील विविध दहा महत्त्वाच्या मुद्यांवर राव यांनी मोदींशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी शुक्रवारी मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली होती. या वेळी राज्यातील विविध प्रकल्पांना केंद्राने परवानगी देण्याची मागणी करत तेलंगणसाठी वेगळ्या उच्च न्यायालयाची स्थापना करण्याचा मुद्दाही राव यांनी पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेवळी उपस्थित केला. राज्यातील महत्त्वाकांक्षी कालेश्वरम सिंचन प्रकल्पावर राज्याने 25 हजार कोटी रुपयांचा निधी खर्चा केला असून, केंद्राने या प्रकल्पासाठी तातडीने 20 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राव यांनी केली. कालेश्वरम प्रकल्पामुळे तेलंगणमधील 18 जिल्ह्यांमधील 18 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे, हे राव यांनी पंतप्रधानांच्या नजरेस आणून दिले.
राव यांचे तिसऱ्या आघाडीला प्राधान्य
नव्याने निर्मित राज्यातील नव्या विभागीय यंत्रणेला राष्ट्रपतींची मंजुरी घ्यावी, अशी विनंतीही राव यांनी मोदी याच्यांकडे केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजप आणि कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याचा पर्याय राव यांनी काही दिवसांपूर्वी मांडला होता. त्यानंतर राव आणि मोदी यांच्यातील ही पहिलीच भेट होती, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते.
आकडेवारी
कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प
18 लाख हेक्टर सिंचनाखालील क्षेत्र
18 जिल्ह्यांचा समावेश
25 हजार कोटी राज्याने खर्च केलेला निधी
20 हजार कोटी केंद्राकडे मागणी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.