तृतीयपंथीयही शारदेच्या व्यासपीठावर 

sakal_exclusive.jpg
sakal_exclusive.jpg

नवी दिल्ली : तृतीयपंथी, समलैंगिक समुदायाची (एलजीबीटी) समान हक्कांसाठीची न्यायालयीन लढाई सुरू असतानाच साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च अशा साहित्य अकादमीने तृतीयपंथीयांना सरस्वतीचे व्यासपीठ खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. अकादमीतर्फे कोलकात्यात उद्या (ता. 17) पहिले तृतीयपंथीय कविसंमेलन होणार आहे. कायद्याद्वारे आतापावेतो मुख्य समाजाने वाळीत टाकलेल्या या समूहाला लिहिते करण्याचा व व्यक्त होण्याचा देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग मानला जातो. कोलकात्यातील कविसंमेलनाचा प्रतिसाद पाहून हाच प्रयोग राष्ट्रीय पातळीवरही करण्याचा विचार भविष्यात होऊ शकेल, असे अकादमीच्या वरिष्ठ सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले. 

कोलकात्यातील अकादमीचे कविसंमेलन हे खास तृतीयपंथी कवींसाठी असणार आहे. अकादमीच्या सल्लागार मंडळाच्या सदस्या, प्राचार्या मनाबी बंडोपाध्याय या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील. बंडोपाध्याय या कोलकात्यातील प्रख्यात कृष्णनगर महिला महाविद्यालयाच्या (स्थापना 1958) प्राचार्या आहेत. "एलजीबीटी' समुदायाच्या हक्कांसाठी त्या कायम लढत आल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली अकादमीच्या कोलकाता येथील विभागीय मुख्यालयात दुपारी साडेचारला हा कार्यक्रम होईल. या संमेलनात अंजोली मंडल, अरुण नाथ, देवदत्त विश्‍वास, देबायुती भट्टाचार्य, प्रस्फुटित सुगंध व राणी मुजूमदार आदी सहभागी होतील. हे सारे तृतीयपंथी किंवा त्यांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. 

दरम्यान, कलम 377 बाबत न्यायालयाने अद्याप निकाल दिलेला नसताना, या समूहासाठी असे कविसंमेलन भरविण्याचा प्रयोग धाडसी नाही काय, या प्रश्‍नाला अकादमीचे ठाम उत्तर, नाही असे आहे. सूत्रांनी सांगितले, की तृतीयपंथी असतील किंवा समाजासमोर खुलेपणाने आलेले समलैंगिक असतील, त्यांचे समाजातील स्थान काय, यापेक्षाही त्यांच्यातील साहित्यिक व काव्यगुणांना समाजासमोर आणावे, या दृष्टिकोनातून अकादमीचा हा उपक्रम आखलेला आहे. 

भेदभावाचे कारण नाही 
"एलजीबीटी' हा सध्या समाजातील बहिष्कृत घटक आहे. मात्र अकादमीने स्थापनेपासूनच समाजाने बहिष्कृत ठरविलेल्या वेगवेगळ्या घटकांना व्यासपीठ दिले आहे. ते अकादमीचे कर्तव्यच आहे. या समूहातील लोकांचे समलैंगिक, उभयलैंगिक किंवा तृतीयपंथी असणे ही मानवी प्रवृत्ती असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्‍न आहे. पण ते चांगले लेखक असतील, कवी असतील तर साहित्याच्या दरबारात त्यांना अटकाव करण्याचे कारण नाही. साहित्यात लिंगभेद मानण्याचे कारण नाही, असेही सूत्रांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com