ट्रॅक्‍स अँड साईन्स : 'सिंहाचा वाटा'

ट्रॅक्‍स अँड साईन्स : 'सिंहाचा वाटा'
ट्रॅक्‍स अँड साईन्स : 'सिंहाचा वाटा'

भारत हा जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश आहे जिथे बृहतमार्जारकुलातले वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी सापडतात. देशाच्या पश्‍चिम टोकाला जुनागडजवळचा गीर हा सिंहांचा देश आहे. पश्‍चिम घाटांच्या सदाहरित अरण्यांपासून ते मध्य भारतातली, विदर्भातली पानझडींची वने, पश्‍चिम बंगालमधले सुंदरबनाचे पाणथळ प्रदेश ते आसाममधल्या अरण्यांपर्यंत वाघांचा वावर आहे. सिंहांच्या विपुलतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आफ्रिकेतल्या गवताळ प्रदेशांमध्ये वाघ नाही आणि तुर्कस्तानापासून ते बर्फाळ सैबेरियापर्यंत आणि आग्नेय आशियातल्या जावा आणि बाली बेटांमध्ये पसरलेल्या भूप्रदेशात सिंह नाही. भारतातल्या जैवविविधतेचे महत्त्व या एकाच मुद्‌द्‌याने अधोरेखीत व्हावे.

हे आज आठवायचे कारण म्हणजे गीरच्या अभयारण्याभोवतीच्या ईको-सेन्सेटिव्ह झोनचा (पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनाशील भूभाग -ईएसझेड) आकार कमी करण्याच्या प्रस्तावावरून सुरू असलेली चर्चा. गीर हे आशियायी सिंहांचे (शास्त्रीय नावः पॅंथेरा लिओ पर्सिका) शेवटचे वसतीस्थान. या गीर अभयारण्याभोवतीचा सिंहांच्या वावराच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला भूभाग आक्रसत गेला तर त्याचे विपरीत परिणाम होतील, अशी भिती वन्यजीव अभ्यासकांना वाटते आहे. यातून अनर्थ घडेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

प्राण्यापक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या एका मित्राबरोबर अशाच गप्पा मारताना त्यानी केलेलं एक विधान असंच लक्षात राहीलं होतं. प्राण्यांना हद्दी कळत नाहीत, असं तो कुठल्यातरी संदर्भात बोलताना म्हणाला होता. होतं काय, अभयारण्याच्या सीमांना लागून अगदी तस्संच दिसणारं आणि वागणारं रान असतं. फरक असतो तो त्या जमिनीच्या आणि त्यावरच्या झाडांच्या, गवताच्या मालकीचा. अभयारण्यात ती मालकी सरकारची असते, आणि त्यापलीकडे कोणा एका व्यक्तीची, संस्थेची असते. नकाशावर या सीमा छान आखलेल्या पण असतात. प्रश्‍न इतकाच असतो की ज्या प्राण्यांना सुरक्षितपणे वावरता यावं म्हणून नकाशांवर अभयारण्यांच्या सीमा रेखाटल्या जातात त्यांना माणसांची भाषा वाचता येत नाही, पर्यायाने अभयारण्य कुठे संपतं ते त्यांना कळत नाही आणि अभयारण्याला लागून असलेलं अभयारण्यासारखंच रान त्यांना आपल्यासाठी नाही, हेही त्यांना समजत नाही; आणि ते माणसांच्या जमिनीवर "आक्रमण' करतात. अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या वनांना लागून असणाऱ्या जमिनींचा अनिर्बंध "विकास' झाला, माणसांचा वावर वाढला, त्या जमिनी वापरण्याच्या पद्धतीत, तिथल्या पीक पद्धतीत, तिथल्या बांधकामांत, नैसर्गिक स्त्रोतांच्या वापराच्या प्रमाणात आजूबाजूच्या पर्यावरणाशी विसंगत ठरणारे बदल झाले; तर त्याचे परिणाम संरक्षित वनांनाही भोगावे लागतात. अभयारण्यांच्या शेजारच्या जमिनींवरही म्हणून काही निर्बंध असावेत असा विचार स्वीकारला गेला. हा ईएसझेड.

वनांच्या आजूबाजूलाही प्राण्यांचा वावर असतो. काहीवेळा दोन अरण्यांना जोडणारे वनांचे पट्टे असतात. प्राण्यांच्या वावराचा विचार केला तर हे पेट्‌ट्‌ही खूप महत्त्वाचे ठरतात. या सगळ्या जमिनी प्राण्यांच्या भवतालाचा भाग असतो आणि म्हणून तो जपला जावा, असं वन्यजीव अभ्यासकांना वाटतं. गीरच्या संदर्भात अलिकडे आलेल्या बातम्यांनुसार स्थानिक वनखात्याला गीर भोवतालचा ईएसझेड आठ ते अठरा किलोमिटरवरून अवघ्या अर्ध्या किलोमिटवर आणायचाय. त्यामुळे सिंहप्रेमी अभ्यासक अस्वस्थ आहेत. असं घडलं तर गीरच्या परिसरातला सिंहांचा वावर आक्रसेल, असं त्यांचं मत आहे.

गीरच्या सिंहांचाही एक इतिहास आहे. आशियायी सिंहांसाठी काही भूभाग राखून ठेवण्याची मूळ कल्पना भारताच्या इतिहासात ज्याच्या नावासमोर (दडपशाही, हुकूमशाहीतच्या अर्थाने) "शाही' हा शब्द जोडला जातो त्या लॉर्ड कर्झनची. जुनागडच्या महाराजांनी कर्झनच्या कल्पनेनुसार सासण-गीरच्या परिसरात सिंहांच्या शिकारीला बंदी करून जंगलच्या राजाला अभय दिलं. ही घटना विसाव्या शतकाच्या सुरवातीची. त्याकाळात गीर परिसरात ब्रिटीश अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या बरोबरीने शेकडो सिंहांची शिकार केल्याच्या अनेक नोंदी सापडतात. गीरमध्ये अवघे वीस सिंह उरले आहेत अशी 1913च्या आसपासची एक नोंद मला या संदर्भात वाचताना मिळाली. गीरला अभयारण्याचा दर्जा मिळाला 1965 मध्ये. म्हशी किंवा रेड्यांच्या भक्ष्याचे आमिष दाखवून तिथे "लायन शो' व्हायचे. वीस-बावीस वर्ष ते चालू होते.
सिंहांसाठी माहिती असलेलं गीर आज देशातला जैवविविधतेचा एक महत्त्वाचा ठेवा आहे. एका नोंदीनुसार साडेतेवीसशेपेक्षा जास्त लहानमोठे प्राणी, तीनशे जातींचे पक्षी, पस्तीसएक सपरटे आणि दोन हजारांच्या आसपास किटकांच्या प्रजाती आज गीरमध्ये नांदत आहेत. इथे एक मगर प्रजनन केंद्रही आहे.

भारतातली अरण्यं आक्रसत चालली आहेत, असे अनेक अभ्यास दर्शवतात. वनक्षेत्र किती असावं याचे काही निकष आहेत. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडीयाने 2013मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशातल्या 21 टक्‍क्‍यांपेक्षा थोडी जास्त जमीन वनांखाली होती. यात वनांखालची सर्वाधिक जमीन होती मिझोराममध्ये. आणि सगळ्यात कमी होती पंजाब आणि हरियानात. त्या आकडेवारीप्रमाणे गुजराथमध्ये जवळपास साडेसात टक्के आणि महाराष्ट्रात साडेसोळा टक्के जमीनी वनांखाली होत्या. गीरच्या सभोवतालचा ईको-सेन्सेटिव्ह झोन कमी करण्याच्या निर्णयाबद्दल वन्यजीव अभ्यासकांच्या मनात असलेल्या भितीला कदाचित ही पार्श्‍वभूमी आहे.

दुसऱ्या एका बातमी नुसार गेल्या काही महिन्यांपासून गीर आणि गिरनार या दोन अभयारण्यांना युनेस्कोची मान्यता मिळावी असे प्रयत्न चालले आहेत. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे म्हणे. पाठोपाठ या दोन्ही बातम्या वाचल्यानंतर त्याची संगती लावणं जरा कठीणच आहे. अभयारण्याला लागून असणाऱ्या परिसरातला "विकास' पूरक राहीला नाही तर पर्यटकांना आकर्षित करण्यासारखं काय राहील कोण जाणे.. पर्यटन वाढवून रोजगार निर्माण करून अभयारण्याच्या परिसरातल्या माणसांच्याही जगण्याची दर्जा वाढवण्यात गैर काहीच नाही. पण हे करत असताना ज्या सिंहांसाठी पर्यटकांनी यावं असं आपल्याला वाटतंय त्या सिंहांच्या वाट्याचा विचारही करायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com