नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांदरम्यान प्रश्नपत्रिकेमध्ये चुका आढळल्यास त्या उमेदवाराने निदर्शनास आणून देण्यासाठी आयोगाने सात दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे.
आयोगातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांना देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. "यूपीएससी'ने सांगितल्यानुसार, प्रश्नपत्रिकेमध्ये चुक वाटल्यास परीक्षेनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते परीक्षेनंतरच्या सातव्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यास उमेदवाराकडे वेळ आहे. तसेच, केवळ आयोगाच्या ईमेल आयडीवरच (examination-upsc@gov.in) आपले म्हणणे पाठविता येईल, टपालाद्वारे अथवा प्रत्यक्ष जाऊन असे करण्यास परवानगी नाही.
या सात दिवसांच्या कालावधीनंतर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
|