अर्भक मृत्यू प्रकरण: फरुक्काबादच्या जिल्हाधिकाऱ्याची बदली

अर्भक मृत्यू प्रकरण: फरुक्काबादच्या जिल्हाधिकाऱ्याची बदली

लखनौ: फरुक्काबादच्या डॉ. राममनोहर लोहिया जिल्हा रुग्णालयातील 49 अर्भक मृत्यूप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने कारवाई करत फरुक्काबाद जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली आहे. तसेच हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मुख्य आरोग्य अधिकारी (सीएमओ)आणि मुख्य आरोग्य अधीक्षक(सीएमएस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांची बदलीदेखील केली आहे. अर्भकाच्या मृत्यूमागे ऑक्‍सिजनचा अभाव आणि देखभालीकडे दुर्लक्ष असल्याचे अहवालात म्हटले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने फरुक्काबाद रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण गांभीर्याने घेतले असून, दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून घटनेतील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. घटनेचे गांभीर्य पाहून सरकारने जिल्हाधिकारी, मुख्य आरोग्य अधिकारी आणि जिल्हा महिला रुग्णालयाच्या मुख्य आरोग्य अधीक्षकांची बदली केली आहे. 20 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 या काळात जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी 461 महिला दाखल झाल्या होत्या. त्यात 468 बालकांचा जन्म झाला. त्यापैकी 19 मुलांचा जन्म होताच मृत्यू झाला. उर्वरित 449 पैकी गंभीर प्रकृती असलेल्या 66 अर्भकांना नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यातील 60 मुलांत सुधारणा झाली आणि 6 जणांना वाचवण्यात यश आले नाही. याशिवाय 145 अर्भक विविध रुग्णालयांतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यात 121 अर्भकांवर यशस्वी उपचार झाले. यादरम्यान, 20 जुलै ते 21 ऑगस्टदरम्यान 49 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आणि त्यात 19 अर्भकांचा समावेश आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानंतर मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या चौकशीत समाधान न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. त्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे शहर दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात अर्भकांच्या मृत्यूमागे ऑक्‍सिजनच्या अभावाचे कारण सांगितले आहे. असे असताना सरकारी प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीत मात्र ऑक्‍सिजनच्या कमतरतेचा उल्लेखच केलेला नाही.

ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळेच मृत्यू
उत्तर प्रदेशच्या फरुक्काबाद जिल्ह्यात एक महिन्यात ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळेच 49 अर्भकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोन आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तगुन्हा दाखल झाला आहे. तीस अर्भकांचा मृत्यू डॉ. राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात, तर 19 अर्भकांचा मृत्यू प्रसूतीदरम्यान झाला. यासंबंधी दुजोरा देत अधिकाऱ्याने म्हटले, की अचूक उपचाराचा अभाव, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे अर्भकांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com