नवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने 2004 साली मिळवलेला विजय कोणीही विसरू शकणार नाही. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला 'हम होंगे कामयाब' हे गाणं ऐकवले होते. 'फक्त सामना जिंकू नका, मनंही जिंका' असा कानमंत्र वाजपेयींनी सौरव गांगुलीला दिला होता.
टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी एका मुलाखतीत वाजपेयी आणि भारतीय क्रिकेट संघाच्या भेटीचा किस्सा सांगितला होता. 'भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, अशी अटलबिहारी वाजपेयींची इच्छा होती. क्रिकेट हा त्यासाठी दुवा ठरला. अटलजींमुळेच हा दौरा शक्य झाला. सरकारच्या मंजुरीनंतर बीसीसीआयने आपला संघ पाकमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय क्रिकेट संघ तब्बल 19 वर्षांनी पाकिस्तानात गेला होता. संघात गांगुलीसोबत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग असे दिग्गज होते. यावेळी 'फक्त सामना जिंकू नका, मनंही जिंका' असा कानमंत्र वाजपेयींनी सौरव गांगुलीला दिला होता.
'पाकिस्तान दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातून आम्हाला मेसेज आला होता. पंतप्रधानांना आमच्या टीमला भेटायचे होते. बागेत नेव्ही पथक देशभक्तिपर गाणी वाजवत होते. अटलजींनी आमच्यासोबत जवळपास तासभर गप्पा मारल्या. विशेष म्हणजे प्रत्येकाशी ते बोलले. आमच्या क्रिकेटपटूंचे ऑटोग्राफ असलेली एक बॅट आम्ही वाजपेयीजींना दिली. त्यांनीही आम्हाला एक बॅट भेट दिली. त्यावर लिहिले होते की, खेल ही नही, दिल भी जीतिये, शुभेच्छा', हा महत्त्वाचा दौरा आहे. सर्वांनी मनापासून खेळा, आम्ही निघताना वाजपेयींनी आम्हाला आणखी एक गाणं ऐकायला सांगितलं- हम होंगे कामयाब...
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत पाकिस्तानविरोधात एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर वाजपेयींनी गांगुलीला फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.