अमरावती, (आंध्र प्रदेश) : राजकारणातील महिलांचा टक्का वाढायला हवा. कारण, त्यांचे नेतृत्त्व जगाला अधिक सुरक्षित करेल. महिलाच मानवी मूल्यांचा अधिक प्रभावीरीतीने प्रचार आणि प्रसार करू शकतात, असे प्रतिपादन तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी आज केले. ते राष्ट्रीय महिला संसदेच्या उद्घाटनसत्रात बोलत होते.
शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार महिला याच इतरांच्या दुःखाप्रती अधिक संवेदनशील असतात, आज या पृथ्वीवर दोनशेपेक्षाही अधिक देश आहे. बहुसंख्य देशांचे नेतृत्त्व हे महिलांकडे आल्यास आपले जग अधिक सुरक्षित होऊ शकेल. विसाव्या शतकामध्ये आपले नेमके काय चुकले, याचे आपल्याला विश्लेषण करावे लागेल. आता या क्षणाला लोक एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. या संघर्षापासून आपण स्वत:ला वेगळे करू शकत नाही. कारण, आपण सगळे एक आहोत. एकविसाच्या शतकामध्ये अधिक शांतता कशी प्रस्थापित करता येईल, याचाही आपल्याला विचार करावा लागेल, असे लामा यांनी सांगितले. जैविकदृष्ट्या महिलांकडे मोठे सामर्थ्य असते त्यामुळे महिलांनी मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये मूल्यांचा प्रसार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
|