चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 28, 2012 AT 11:48 PM (IST)
कऱ्हाड - करवडी येथील अल्पवयीन मुलाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी संबंधित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर बलात्काराच्या गुन्ह्यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुलीला उपचारासाठी साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. मुलावर गेल्या चार वर्षांपासून मनोरुग्ण असल्याबाबतचे उपचार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.
काल सायंकाळी करवडी येथील शाळेच्या परिसरात लहान मुली खेळत होत्या. त्या वेळी संबंधित मुलगा त्या परिसरात गेला. त्याने त्या चार वर्षांच्या मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने अंगणवाडीच्या शौचालयात नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यामुळे त्या मुलीने आरडाओरडा केला. त्यादरम्यान त्या परिसरातून जात असलेल्या दोन मुलींना आवाज आल्याने त्या तिथे गेल्या. तिथे संबंधित मुलगा व मुलगी त्यांना दिसली. त्यावर तो मुलगा तेथून पळून गेला. दरम्यान, दोन मुलींनी त्या मुलीला तिच्या घरी नेले. त्या मुलीच्या आई- वडिलांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पोलिस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली. त्यावर पोलिसांनी तातडीने त्या मुलीला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने त्या मुलीला सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, तेथील तपासणीत संबंधित मुलीवर अतिप्रसंग झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक बरकत मुजावर यांनी दिली. याप्रकरणी काल रात्री उशिरा मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात त्या मुलाला गेल्या चार वर्षांपासून मनोरुग्ण असल्याबाबत उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्याचे तपास अधिकारी व पाटणचे पोलिस उपअधीक्षक फत्तुलाल नायकवडी यांनी सांगितले. या प्रकरणाची दखल घेऊन पोलिस निरीक्षक मुजावर यांनी काल रात्री तेथील लोकांची बैठक घेऊन गावामध्ये शांतता राखण्याचे आवाहन केले होते. या मुलावर बलात्काराच्या गुन्ह्यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षकांची भेट
करवडी येथे घडलेल्या घटनेची दखल घेऊन पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी आज तेथे भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यामध्ये ग्रामस्थांनी या प्रकाराचा निषेध केल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षक प्रसन्ना यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना गावामध्ये शांतता व सलोखा राहील, असे वातावरण ठेवण्याचे आवाहन केले.