अमळनेर (जि. जळगाव) : गेल्या दोन वर्षांपासून कोविड (Covid) प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाइन होत्या. त्यामुळे पाठ्यक्रमात कपातही केली होती, मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून १ ली ते १२ वीसाठी १०० टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव इ. मु. काझी यांनी दिली आहे.
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाइन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते बारावीचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यात आला होता. तसेच कोविड -१९ आपत्कालीन परिस्थिती कायम राहिल्याने सदर कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कायम ठेवण्यात आला होता.
यावर्षी कोविडची परिस्थिती सुधारल्यामुळे राज्यातील सर्वच शाळा १३ जूनपासून नियमित सुरू झाल्या आहेत. पर्यायाने यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता १ ली ते १२ वी साठी १०० टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. याबाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर तसेच इतर माध्यमांद्वारे योग्य ती प्रसिध्दी द्यावी, असे ही निर्देशित करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.