|
|  |
 | | पंचांग | | १७ मे - जागतिक दूरसंचार दिन १७४९ - देवीच्या रोगावरील लस शोधून काढणारे ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचे
निधन.
१८४६ - मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. "दर्पण'
हे वृत्तपत्र १८३२ मध्ये त्यांनी सुरू केले.
१९१४ - मॉडर्न हायस्कूलमधील गणित विषयाचे नामवंत माजी अध्यापक मोरेश्वर गोपाळ तथा
नानासाहेब चाफेकर यांचा जन्म.
१९७२ - मुंबई चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा भव्य पुतळा बनविणारे शिल्पकार रघुनाथ
कृष्ण फडके यांचे निधन.
१९९४ - पदार्थ विज्ञान, जैविक तंत्रज्ञान आणि संपर्कशास्त्र विषयांतील ज्येष्ठ
शास्त्रज्ञ प्रा. डॉ. माधव रामचंद्र ऊर्फ एम. आर. भिडे यांचे निधन.
१९९९ - ज्येष्ठ हार्मोनिअमवादक आणि संगीत दिग्दर्शक मोरेश्वर ऊर्फ बाळ माटे यांचे
निधन.
२००२ - तेनसिंग नोर्गे यांचा नातू ताशी वांगचुकसह ५४ गिर्यारोहकांनी एकाच दिवशी
"माऊंट एव्हरेस्ट' चढाई करीत विक्रम नोंदविला. |
दिनमान मेष - खर्चाचे प्रमाण कमी होणार आहे. अडचणी कमी होतील. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल.
वृषभ - काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.
खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन - आर्थिक लाभ वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. व्यवसायातील अंदाज अचूक
ठरतील.
कर्क - आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
सिंह - जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
आत्मविश्वास वाढेल.
कन्या - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता. महत्त्वाचे आर्थिक
व्यवहार पूर्ण करू शकाल.
तूळ - काही आनंददायी घटना घडतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्वास
उत्तम राहील.
वृश्चिक - फारशी अनुकूलता लाभणार नाही. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वैवाहिक सौख्य
लाभेल.
धनू - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काहींना विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद
साधाल.
मकर - व्यवसायात वाढ करू शकाल. प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू
शकाल.
कुंभ - मनावरील ताण कमी होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
मीन - आत्मविश्वास कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो
आज नकोत.
- प्रा. रमणलाल शहा |
गुलदस्ता - निसटलेली संधी ""खरं सांगू, तुम्ही लिहिल्याप्रमाणे फिरून नव्याने जगण्याची संधी मला आणि हो,
त्यालाही मिळालेली होती.. पण त्या संधीचं सोनं मात्र आम्ही दोघेही करू शकत नाही.
आम्हाला असं पुन्हा नव्याने एकमेकांना समजून घेणं जमत नाही ए.... काय होतंय कळत
नाही; पण संधी निसटून जातीय... हे मात्र खरं आहे...''
फोनवरून पलीकडून नॉनस्टॉप चाललेलं बोलणं केवळ हुंकार देऊन मी ऐकत होते... काही तरी
उपाय सुचवाल? आर्जवपूर्वक विचारणा झाली. पुढे त्या भरभरून बोलत होत्या. काय होतंय,
आम्ही दोघं सध्या मुलंमुली आपापल्या मार्गी लागल्यामुळे निवांत आहोत. पण हेच
निवांतपण आमच्या नव्या कुरबुरी वाढवायला कारणीभूत होत आहे.
त्यांना थांबवत मी म्हटलं, "अहो निवांतपणाचं सुद्धा वेळापत्रक तयार करावं लागतं.
मफिरून नव्याने जगतानाफ मध्ये सुचविल्याप्रमाणे "राहून गेलं आहे' अशा सदरातल्या
गोष्टींची उजळणी करून प्रथम त्या राहून गेलेल्या गोष्टी करायला हव्यात. माझी खूप
इच्छा असते; पण साक्षात्कार झाल्याप्रमाणे त्याचा विचार आधीपासूनच मी तुझ्या
स्वभावाला फार सांभाळून घेतलंय. दोन तपांहून अधिक वाटचाल मी तुझ्याबरोबर करत आलो
ती म्हणे, "तारेवरची कसरत होती. खरं तर त्याच्याबरोबर संसार करताना मीच तारेवरची
कसरत होते.'...
एकूण प्रकार माझ्या लक्षात आलाय. ""मागचं पुस्तकच तुम्ही दोघेही उघडून बसला आहात.
त्याच पुस्तकातली पानं वाचताय, नेमकी अशी पानं वाचताय, त्यातून आनंद मिळत नाहीए.
उलट "नको त्या आठवणीच तुम्ही कुरवाळत बसता आहात... मी बरोबर बोलतीय ना?
पटतंय किती मोठ्ठा "त्याग' आपण एकमेकांसाठी केलाय अशीच आम्ही "धारणा' करून घेतलीय.
मग कोण जास्त, कोण कमी हे तोलत बसण्यातच दिवस पुढे पळत आहेत.... एक करा ""आजपासून
प्रत्येक येणारा दिवस नवा कोरा समजा. तो दिवस आनंदाने सजवा. छोट्या छोट्या कृतीतून
एकमेकांना सांभाळून घेणं हा आनंद असतो. कृत्रिमपणाचा लवलेश ही नसलेल्या या
प्रेमाच्या जगात पुन्हा एकदा नव्याने जगून बघा. नक्की जमेल. तुम्हा दोघांना. तेवढं
दोघांचं पुन्हा मेतकूट जमलं की कळवा...
मेतकुटावरून आठवलं, "मऊसर भात अन् मेतकूट आम्हा दोघांनाही हा नाष्टा खूप आवडतो.
ठेवते फोन आता त्याची फिरून यायची वेळ झाली. भात करते आता....
चला ... मेतकूट जमलंय... संधी साधली गेली.
- विनया देसाई |
योगदान - स्वामी योगानंद तरुण योगीन दक्षिणेश्वरच्या मंदिराच्या परिसरात अनेकदा जायचा. एकदा मध्यमवयीन असे
एक गृहस्थ त्याला बागेत हिंडताना दिसले. फुलं गोळा करताना योगीननं त्यांची मदत
घेतली. काही वर्षानंतर "सुलभ समाचार' या पत्रिकेत त्यानं श्रीरामकृष्णांच्या
शिकवणीबद्दल वाचलं. कुतूहल वाढल्यामुळे ती पत्रिका हातात घेऊन योगीन
श्रीरामकृष्णांना भेटायला आला. त्यांना पाहून तो चपापला. काही वर्षांपूर्वी तो
ज्यांना माळीबुवा समजला होता ते होते श्रीरामकृष्ण!
हा योगीन म्हणे योगींद्रनाथ रायचौधुरी. संन्यासानंतरच नाव स्वामी योगानंद. त्यांचा
जन्म झाला ३० मार्च १८६१ रोजी. योगानंद स्वतः धर्मपरायण होते; पण चिकित्सकही होते.
स्वतःला नीट पटल्याशिवाय ते श्रीरामकृष्णाचे मतदेखील मानायचे नाहीत. व्यवहारात
वागावं कसं, दुसऱ्याच्या घरी जाताना आपल्या व्यक्तिगत वापराच्या वस्तू नेणं कसं
गरजेचं असतं. साधू होणं म्हणजे रीतिभाती पाळताना मूर्खपणा करणं नव्हे, तसेच साधू
होणे म्हणजे भोळसटपणाही नव्हे. अशा कितीतरी गोष्टी ते श्रीरामकृष्णांच्या सहवासात
शिकले. वराहनगरच्या मठात गुरुबंधूंच्या बरोबर त्यांनी स्वतःला उपासनेत झोकून दिलं.
उपासना, जपध्यान करताना त्यांना अस्तित्वाचा पूर्णपणे विसर पडत असे.
स्वामी योगानंदांनी स्वतःचं आयुष्य श्री सारदादेवींची सेवा करण्यात व्यतित केलं.
स्वामी विवेकानंदांच्या पाश्चात्त्य देशातील कामाचं कौतुक करण्यासाठी स्वामी
योगानंदांनी स्वागत सभा आयोजित करण्यासाठी अपार कष्ट घेतले. १ मे १८९७ रोजी
बलरामबाबूंच्या घरी "रामकृष्ण मिशन'ची स्थापना झाली. तेव्हा स्वामी योगानंदांना
उपाध्यक्ष करण्यात आलं. मिशनच्या स्थापनेमागचे स्वामीजींचे उद्देश स्वामी
योगानंदांनी पूर्णपणे समजून घेतले. शंका वाटली तेव्हा स्पष्टपणे प्रश्नही
विचारले. पण पूर्ण खात्री पटल्यानंतर मात्र त्यांनी मिशनच्या कार्यासाठी वाहून
घेतले. श्री सारदादेवींवरची अतूट श्रद्धा आणि प्रेम हे स्वामी योगानंदांचे
वैशिष्ट्य. भक्तियोग आणि कर्मयोगाच्या मिलाफाचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी
योगानंदांचं आयुष्य. वयाच्या अडतिसाव्या वर्षी २८ मार्च १८९९ रोजी त्यांनी जगाचा
निरोप घेतला.
- डॉ. सुरुची पांडे |
असामान्य - कुंडलकेशा कुंडलकेशा- (सुभद्दा)- राजगृहीच्या धनिकाची सुंदर, बुद्धिमान कन्या. लाडात
वाढलेली. सत्तुक सराईत शर्विलक. प्रत्येक घर त्याच्या चौर्यकर्माने हैराण. पकडला
गेला तेव्हा कडेलोटाची शिक्षा मिळाली. जेव्हा त्याला कडेलोटासाठी घेऊन निघाले,
तेव्हा सुभद्देने गवाक्षातून पाहिले. प्रेमात पडली. तिच्या हट्टापाई वडिलांनी लाच
देऊन त्याला सोडवले. त्यांचे थाटाने लग्न लावून दिले. आता सारी सुखे सत्तुकाचे
पायाशी. पण लवकरच सुभद्देचे रत्नालंकार खुणावू लागले. डाव आखला गेला. "मरण टळले
म्हणून देवाचा नवस फेडावयास जाऊ' सुभद्दा आनंदाने निघाली. उंची वस्त्रे, मौल्यवान
अलंकार लेवून निघालेली आपली तृप्त लेक पाहून मातापित्यांचे डोळे निवले. सत्तुकाने
साऱ्या चाकरांना पायथ्याशी थांबवले. दोघेच डोंगरावर आले. एका वळणावर सत्तुकाने
आपला नीच हेतू उघड केला.
दागिने घेऊन आपल्याला ढकलून देणार! सुभद्दा शहारली. पण क्षणात ती चतुरा सावरली.
"मी हे आनंदाने आपल्या स्वाधीन करते. एकच शेवटची इच्छा, मला आपण एकदा पुढ्यातून व
एकदा मागून आलिंगन द्यावे.' सत्तुक पाठमोरा वळला तेवढ्यात सुभद्देने त्याला जोराचा
धक्का दिला. बेसावध सत्तुक दरीत कोसळला. जीव वाचलेली सुभद्दा त्या क्षणी ऐहिक
जगाला पाठमोरी झाली. ती घरी न परतता निग्रंथ संघात पोचली. संन्यास घेतला. त्या
वेळी मुंडण केल्यावर तिला परत कुरळ्या केसांच्या बटा उगवल्या.
तेव्हापासून तिला सारे कुंडलकेशा म्हणू लागले. तिने विविध विषयांचे सखोल अध्ययन
केले. तंत्रशास्त्रात पारंगत झाली. अनेक भिक्षूंजवळ राहून ज्ञान मिळवले. पण तिचा
बराचसा वेळ अयोग्य गोष्टी करण्यात जाई. धुळीने माखलेले एकच वस्त्र नेसून ती
गावोगावी फिरे. एका वाळूच्या ढिगावर जांभळीची काठी रोवून वादविवादासाठी आव्हान
करी. सभा जिंकण्यात ती पारंगत होती. सारीपुत्र श्रावस्तीत असताना त्यांनी
कुंडलकेशचे आव्हान स्वीकारले. वादात कुंडलकेशा हरली; पण सारीपुत्रांनी तिची
योग्यता ओळखली होती. एके दुपारी त्यांनी गृद्धकूट पर्वतावर कुंडलकेशेस गौतमांसमोर
उभी केली. बुद्धांच्या दर्शनाने, प्रवचनांमुळे त्या दुर्दैवी जिवास दिशा गवसली.
अशी ही कुंडलकेशा- प्रेमाची चढवलेली गुलाबी वस्त्रे मोठ्या निग्रहाने उतरवून
संन्यासिनीची भगवी वस्त्रे लेवून शांत चित्ताने आयुष्याला सामोरी जाणारी.
- सौ. शुभांगी पाथरकर |
|
|  |
|