आभाळमाया - ऋतुराज पावसाळा शायराला वेड लावणारा, मोराला धुंद-फुंद करणारा आणि ज्याच्या आगमनाची चाहूल लागताच
सहस्रावधी सुगंधी कुप्या उधळून टाकणाऱ्या लाजऱ्याबुजऱ्या लतावेली
माहेरवाशिणीसारख्या कुजबुजू लागतात, हसू-खेळू लागतात. असा ऋतुराज पावसाळा सुखद
वाटतो.
गहिवरलेलं आकाश पाहिलं, की मला उगीचच उदासवाणं वाटतं. का कोण जाणे? पण त्याचवेळी
मला वाटतं, देवाच्या देव्हाऱ्याला उजळून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्या झरझरणाऱ्या
रेशमी धारांमध्ये आहे. आणि मग मनाचाही गाभारा उजळून जातो, पावसानंतरच्या स्वच्छ,
शुभ्र, निरभ्र आकाशासारखा! मग निघतो पवित्र मांगल्याचा धूर, निघतात पवित्र
प्रेमाचे सूर, दुमदुमून टाकतात सारा आसमंत... आणि मधूनच एखादा राग गावासा वाटतो,
सतारीची तार छेडावी वाटते. बाहेर डोकावून बघावं तर निसर्ग बहुरूप्याचं सोंग घेऊन
बसला आहे की काय असं वाटतं. गंध भारलेल्या पृथ्वीचे, तृप्तीचे सुस्कारे टाकून
आपल्या अंगाखांद्यावर लडिवाळपणे लतावेलींना-वृक्षराजांना खेळताना पाहिलं की,
नातवंडं अवतीभोवती घेऊन बसलेल्या आजीची आठवण येते. या वेळी खोडकरपणे आकाशाच्या
कोपरातून हा खेळ बघणारं इंद्रधनुष्य अधिकच विलोभनीय-कमनीय दिसतं. हिरव्या पिकांतून
डोंगरदऱ्या आणि भरगच्च वाहणाऱ्या नद्यांमधून हा वर्षाऋतू जीवनाचा नवा अर्थ सांगून
जातो. व्यक्तिमत्त्व हसरं, प्रसन्न बनवितो. वर्षभर उराशी साठवलेली दुःखं
वर्षाऋतूच्या आगमनानं सरीत्पावन होतात. वर्षाऋतूच्या हिरवेपणात जाई, जुई,
पारिजातकाच्या राशींमध्ये स्वतःला हरवून बसावंसं वाटतं. काळ्याकुट्ट मेघांनी
भरलेलं आकाश मला पाहवत नाही; पण या काळ्याकुट्ट नगाऱ्यावर सृष्टीसुंदरी दामिनीचे
हात नाचू लागले, की मन मुग्ध होऊन जातं.
खरंच! पावसाचं दृश्य किती मनोवेधक. मला तर पावसात फिरायला खूप आवडतं. छत्री घेऊन
पावसात फिरायला जायचं, निसर्गाचं हिरवं, ताजं, टवटवीत रूप बघायचं. पावसाचे थोडेसे
थेंब अंगावर घ्यायचे. शाळेत जाणारी रेनकोट घातलेली मुलं किती सुंदर दिसतात!
झाडाखाली, आडोशाला थांबलेल्या गायी-म्हशी, पाऊस थांबल्यावर उडणारे पक्ष्यांचे थवे,
इंद्रधनुष्याचे तोरण. असा हा भिजलेला, हिरवा नटलेला निसर्ग मन मोहून टाकतो. जगावं
तर या क्षणांसाठीच! असं होऊन जातं. वनराईनी नटलेला निसर्ग मन टवटवीत करतो. दिवस
उत्साहात, आनंदात जातो. हा निसर्ग मन ताजंतवानं ठेवतो. कधीकधी वाटते या पावसाचा
प्रत्येक थेंब व्हावं, तासनतास बघत बसावं पावसाचा खेळ. वाटतं आपल्या जीवनातील सगळा
अंधार, दुःखं या पावसात विरघळून जावीत. नवा प्रकाश, नवी दिशा, नवी आशा यांनी जीवन
उजळून जावं, गंधित व्हावं....
- डॉ. आरती दिनकर |