'तेलंगण'मुळे आंध्रात तीनशे कोटींचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 12:15 AM (IST)
हैदराबाद - वेगळ्या तेलंगण राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आंध्र प्रदेशातील जनजीवन विस्कळित झाले आहे. वाहतूकसेवेबरोबरच कामकाज ठप्प झाल्याने राज्याचे रोज सुमारे तीनशे कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
तेलंगण राष्ट्र समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाचा हैदराबाद, तेलंगणासह राज्यातील माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन, वाहतूक, मनोरंजन, बांधकाम अशा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. आंध्र प्रदेश चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनानंतर राज्यातील परिस्थिती स्फोटक होत आहे. सरकारचे रोज 25 कोटी, तर औद्योगिक क्षेत्राचे तीनशे कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. राज्यात सध्या तेराशे "आयटी' कंपन्या असून, त्यात साडेतीनशे कॉल सेंटर आहेत. त्यांचे रोज 50 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
"आयटी हब' म्हणून ओळख असलेल्या हैदराबादमधील "आयटी' कंपन्यांनी या आंदोलनामुळे आपला व्यवसाय इतर शहरांमध्ये हलविण्याचा विचार सुरू केला आहे. या कंपन्या पुणे किंवा चेन्नई या शहरांकडे वळू शकतात, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. आंदोलनामुळे हैदराबादमधील आयटी कंपन्यांमध्ये केवळ 60 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहू शकली, अशी माहिती हैदराबाद सॉफ्टवेअर एक्स्पोस्टर्स संघटनेचे अध्यक्ष एम. नरसिंह राव यांनी दिली. दहा दिवसांपासून पेटलेल्या या आंदोलनामुळे रखडलेली कामे कशी पूर्ण करायची, असा प्रश्न या कंपन्यांना पडला आहे. या अशांततेमुळे राज्यातील कुशल अभियंतेही इतर राज्यांकडे वळण्याची भीती या कंपन्यांना सतावत आहे.