भारत-श्रीलंका संघात आज मोहालीमध्ये दुसरी ट्वेंटी-२० लढत
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 11, 2009 AT 01:59 PM (IST)
मोहाली - विश्वकरंडक ट्वेंटी-२० स्पर्धेतील विजेतेपद भारताने अवघ्या दोन एक वर्षांपूर्वी जिंकले. त्याच संघातील कित्येक खेळाडू अजूनही संघात आहेत, पण ते विजेतेपद आता इतिहास वाटावे अशी परिस्थिती झाली आहे.
त्यातच श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातील कामगिरी पाहिल्यास भारतीय संघव्यवस्थापनासमोर कुणाला घ्यावे आणि कुणाला वगळावे, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित त्याचमुळे उद्या होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी याआधी अपयशी ठरलेल्या युसूफ पठाणला संघातून काढण्यास भारतीय संघव्यवस्थापन तयार नाही.
नागपूरला भारताने सलग चौथी ट्वेंटी-२० लढत गमावली, त्याहीपेक्षा या लढतीने संघव्यवस्थापनासमोर अनेक प्रश्न निर्माण केले. माईक यंग यांची भारताचे क्षेत्ररक्षण उंचाविण्यासाठी नियुक्ती झाली आहे; पण क्रिकेटतज्ज्ञ भारतीय क्षेत्ररक्षण तरी करतात का, अशी विचारणा करीत आहेत. त्या वेळी झेल सोडले, धावबादच्या संधी सोडल्या, हे एखाददिवशी घडू शकते; पण त्याहीपेक्षा खेळाडू पूर्ण झोकून देण्यास तयार नाहीत, ही परिस्थिती जास्त चिंता निर्माण करणारी आहे. भारताने सलग चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत हार पत्करली आहे; पण त्याहीपेक्षा त्यापूर्वीचा सच्चा विजय आहे तो एका वर्षापूर्वी श्रीलंकेविरुद्ध. त्या विजयात युसूफ व इरफान या पठाण बंधूंनी निर्णायक कामगिरी केली होती. कदाचित त्याचमुळे युसूफ उद्या संघातील स्थान राखणार आहे.
नागपूरमधील वऱ्हाडी झटक्यामुळे भारतास सर्वच क्षेत्रांत रिपेअर करावे लागणार आहे. त्या परिस्थितीत मालिकेतील बरोबरी साधण्यासाठी कामगिरी कमालीची उंचावणे भाग पडणार आहे. जयसूर्यासारखा बुजुर्ग गोलंदाज धावा रोखत असताना भारतीय फिरकी गोलंदाज सहज धावा देत होते, हेही संघास सतावत आहे. आता श्रीशांत अद्यापही तंदुरुस्त नाही; पण पहिल्या सामन्यात त्याची उणीव जाणवली होती, त्यामुळे त्याला खेळविण्याच्या दृष्टीने विचार होत आहे. रोहित शर्मा तंदुरुस्त नाही, त्यामुळे दिनेश कार्तिकचा समावेश होईल. युसूफ पठाणऐवजी आर. अश्विनचा समावेश करण्याबाबत विचार सुरू आहे; पण तो कितपत प्रत्यक्षात येईल, हे सांगणे अवघड आहे. त्याचमुळे अंतिम संघ उद्या सामन्यापूर्वीच जाहीर होईल, असे सांगण्यात आले.
भारतीय संघव्यवस्थापनास मोहालीचे वेगवान गोलंदाजीस असलेले अनुकूल वातावरण जास्त सलत आहे. याच प्रकारच्या वातावरणात भारतास विश्वकरंडक टी-२० स्पर्धेत पराभवाच्या मालिकेस सामोरे जावे लागले होते. याच वातावरणात युवराज, रैना अपयशी ठरले होते व त्यामुळे पुन्हा एकदा धोनी तिसऱ्या क्रमांकावर येऊन डावास स्थैर्य देण्याचा प्रयत्न करील. अर्थात भारताच्या आशा पुन्हा एकदा सेहवाग-गंभीर या सलामीच्या जोडीवरच असतील.
उत्तर भारतात सध्या जोरदार थंड वारे वाहत आहेत. त्या जोडीला दवही पडणे स्वाभाविक आहे. अशा वातावरणामुळे चेंडू जास्त स्विंग होण्याची चिन्हे आहेत. दवामुळे चेंडूवर पकड राखणे गोलंदाजांना कठीण, तर चेंडू जास्त स्कीड होत असल्यामुळे फटकेबाजीही अवघड, त्यामुळे प्रथम फलंदाजी फायदेशीर की तोट्याची, हाच प्रश्न दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.