नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1915 मध्ये परदेशातून स्वदेशात येताना मुंबापुरीत पाऊल ठेवले होते. गुंतवणूक करताना अशी मुंबई राजधानी असलेल्या परिपूर्ण, सुरक्षित व स्वरक्षित महाराष्ट्राला अनिवासी भारतीयांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केले.

प्रवासी भारतीय दिनाच्या समारोप कार्यक्रमात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री चव्हाण यांनी अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांना आवाहन केले. "गुंतवणूक करताना अडचण आली तर थेट माझ्याशी संपर्क साधा', असे सांगताना त्यांनी आपला वैयक्तिक "ई-मेल' पत्ताही उपस्थित गुंतवणूकदारांना दिला. दिल्लीतील संपर्काची जबाबदारी निवासी आयुक्त अमिताभ राजन व उद्योग सचिव ए. एम. खान यांच्यावर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
""व्यावसायिक गुंतवणुकीसाठी कुशल मनुष्यबळ व पोषक वातावरण, मुक्त व्यापार धोरण, केंद्र व राज्य शासनातील उत्तम समन्वय यामुळे विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे नंदनवन ठरले आहे. आपणही आम्हाला अग्रक्रम द्यावा,'' अशी साद मुख्यमंत्र्यांनी प्रभावी इंग्रजी भाषणाद्वारे जगभरातील अनिवासी भारतीयांना घातली. गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यास भारतात महाराष्ट्राशिवाय अजूनही पर्याय नसल्याचे आपल्या लक्षात येईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील विज्ञान भवनात गेले तीन दिवस झालेल्या प्रवासी भारतीय दिनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी "पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन'द्वारे विचार मांडले. त्यांनी भारतीय संस्कृतीचा विश्वव्यापी प्रसार केल्याबद्दल जगभरातील सुमारे 130 देशांतील 25 दशलक्ष अनिवासी भारतीयांचे आभार मानले. या भारतीयांनी कठोर मेहनत व बुद्धिवैभवाने जगभरात आर्थिक व सामाजिक प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने गुंतवणुकीसाठी आवश्यक त्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आघाडी घेतली आहे. कुशल कामगार पुरविण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न दीडपटीने जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
आगामी पाच वर्षांत 12 कोटी लोकसंख्येच्या आमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक "लक्षाधीश' बनविण्याचा सरकारचा संकल्प आहे. या संकल्पासाठी आपणही हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रगत उद्योग, संपन्न सागरी किनारपट्टी, खनिज संपत्तीने समृद्ध विदर्भ आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई यामुळे देशाच्या एकूण उत्पन्नापैकी 13 टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून मिळते. राज्यानेही विकासदर सातत्याने नऊ टक्के राखला आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. "26-11'च्या मुंबई हल्ल्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांच्या मनातील धास्ती ओळखून मुख्यमंत्र्यांनी मुंबईत उभारलेले "फोर्स वन' संरक्षण दल तसेच अन्य सुरक्षा उपायांची माहिती देत ""मुंबई-पुण्याबरोबर राज्याच्या अन्य भागांतही आपण निर्धास्तपणे गुंतवणूक करा,'' असेही आवाहन केले. मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या तीन वर्षांत राज्यात 20 विमानतळ जन्माला येत आहेत. राज्यात तब्बल 146 विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती होते आहे. 271 अभियांत्रिकी महाविद्यालये, 323 तंत्रनिकेतने व साडेसातशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून राज्यात दर वर्षी पाच लाख कुशल मनुष्यबळाची निर्मिती होते. थेट गुंतवणुकीत तब्बल 53 टक्के वाटा उचलणारे महाराष्ट्र हे देशातले आघाडीचे विकसित राज्य आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या वेळी योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया, केंद्रीय प्रवासी भारतीय मंत्री वायलर रवी, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, राज्याचे उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा आदी उपस्थित होते.