
चितगाव - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 44 वे शतक आणि भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दिलेले तीन धक्के, ही बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी झालेल्या खूपच कमी षटकांच्या खेळातील वैशिष्ट्ये ठरली. आज सुरवातीला धुक्यामुळे खेळ उशिराने सुरू झाला, तर नंतर अपुऱ्या प्रकाशामुळे तो लवकर थांबवावा लागला. त्यामुळे आज केवळ 24.5 षटकांचाच खेळ झाला.
तेंडुलकरच्या भक्कम खेळामुळे भारताला 243 धावांपर्यंत मजल मारता आल्यानंतर बांगलादेशची दमदार सुरवातीनंतर 3 बाद 59 अशी अवस्था झाली होती.
बांगलादेशचाही डाव भारतापेक्षा वेगाने कोलमडणार, याचे संकेतच झहीर खान आणि इशांत शर्मा यांच्या वेगवान माऱ्याने दिले. त्यात प्रामुख्याने झहीरचा मारा अधिक भेदक होता. त्याच वेळी अपुरा प्रकाश बांगलादेशच्या मदतीस धावून आला. पहिल्या दिवशी भारताने सहा धावांत तीन फलंदाज गमावले होते, तर आज बांगलादेशचे तीन गडी पाच धावांतच बाद झाले.
भारताने कालच्या 8 बाद 213 वरून खेळावयास सुरवात केल्यावर आज 30 धावांची भर घातली. त्यात अर्थातच बहुतेक सर्व वाटा होता, तो तेंडुलकरचा. त्याने 29 धावांची भर घालताना आपले 44 वे शतक झोकात साजरे केले. त्यानंतर झहीरच्या रूपाने बांगलादेश संघावर वादळ धडकले. त्यातून त्यांना सावरले ते अपुऱ्या प्रकाशाने. आता उद्या तिसऱ्या दिवशी अर्धा तास लवकर खेळ सुरु होईल व त्याचा फायदा भारतीय गोलंदाज उठवतील, असे वाटते. तेंडुलकरला 44 वे शतक खुणावत असताना, त्याने महत्त्व दिले ते भारताची धावसंख्या शक्य तेवढी वाढविण्याला, पण त्याच्या अखेरच्या दोन सहकाऱ्यांना बांगलादेशने फार वेळ टिकू दिले नाही.
तमिम इक्बाल आणि इम्रूल कायेस यांनी बांगलादेशला जोरदार सुरवात करून देताना 8 षटकांत 38 धावा फटकावल्या होत्या. झहीरच्या साथीला इशांत शर्मा आल्यावर धावगती मंदावली. दोघांच्या अचूकतेमुळे बांगलादेशचे फलंदाज त्रस्त झाले होते. अनेकदा ते चकत होते. त्यांच्याविरुद्ध वारंवार अपील होत होते. तीन षटकांत दोनच धावा झाल्यामुळे त्रस्त झालेल्या कायेसने उजव्या यष्टीबाहेरील चेंडूंचा पाठलाग केला. याच वेळी भारतीय गोलंदाजांची हुकुमत राखणार असल्याचे स्पष्ट झाले.
कायेसला काही वेळातच झहीरने पायचीत केले. त्याच्या वेगवान तसेच यष्टींवरील चेंडूचा कायेसला अंदाजच आला नाही. आयसीएलचा अनुभव असलेला शहरयार नफीस याने उसळता चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर इशांतने त्याला धावांपासून चांगलेच रोखले. इशांतच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंनी तो त्रस्त झाला होता. पुढच्याच षटकात झहीरच्या आत आलेल्या चेंडूने त्याला चकविले, तर त्यानंतर तमिम इक्बालही परतला. तो त्रिफळाबाद झाला, तेव्हा चेंडू त्याच्या बॅटच्या खालून गेला होता. अवघ्या अकरा चेंडूंनी बांगलादेशच्या कसोटीवरील वर्चस्वाच्या आशा दुरावल्या होत्या.
बांगलादेशच्या प्रत्येकाने सचिनसारखी खेळी करण्याचे स्वप्न बाळगले होते, पण ते फक्त सचिनच प्रत्यक्षात आणू शकतो, हे ते विसरले असावेत. सचिनने हाच फरक दाखवून दिला होता. त्याने भारताच्या धावसंख्येस काहीसा आकार दिला. सचिन मैदानात आल्यानंतर 164 धावा झाल्या, त्यातील 105 धावा त्याच्याच राहिल्या. आज 76 धावांवरून सुरवात केलेल्या सचिनने तळाच्या फलंदाजांना स्ट्राईकपासून अधिकाधिक दूर ठेवले आणि 89 वे आंतरराष्ट्रीय शतक केले. शकीब अल् हसन व शहादत हुसेन यांनी प्रत्येकी पाच बळी घेत भारताचा डाव संपविला.
सचिनला फलंदाजीपासून अधिकाधिक दूर ठेवत भारताच्या तळाच्या दोन फलंदाजांना लक्ष्य करण्याचा बांगलादेशचा इरादा होता, पण पहिल्या सहा षटकात सचिनने इशांतला केवळ सहा चेंडू खेळू दिले व त्यापैकी एकाच चेंडूवर इशांत चकला. चार षटकांत अखेरच्या दोन चेंडूंच्या वेळी क्षेत्ररक्षक धावा रोखण्यासाठी पुढे येत, त्या कालावधीत सचिनने 2,4,1,4 आणि 6 धावा घेत नव्वदीत प्रवेश केला. शहादतचा "राऊंड दी विकेट' चेंडू मात्र इशांतला खेळता आला नाही. त्यानंतर श्रीशांतने पहिल्याच चेंडूवर धाव घेतली आणि सचिनने षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर शतक पूर्ण केले. शकीब अल् हसनचा श्रीशांतने आत्मविश्वासपूर्वक सामना केला. त्याच्यानंतरच्या षटकात अखेरचा चेंडू अप्रतिम वाईड यॉर्कर टाकत शकीबने सचिनला अखेरच्या चेंडूवर धाव घेण्यापासून रोखले. त्यानंतरच्या षटकात शकीबने श्रीशांतला टिपले, पण भारताचा डाव झटपट संपविल्याचा बांगलादेशचा आनंद त्यांना बसलेल्या धक्क्यांमुळे फार वेळ टिकला नाही.
धावफलक
भारत - पहिला डाव
कालच्या 8 बाद 213 वरून
सचिन तेंडुलकर नाबाद 105
246 मिनिटे, 166 चेंडू, अकरा चौकार, दोन षटकार
इशांत शर्मा झे. मुश्फिकर रहिम गो. शाहदात हुसेन 1
41 मिनिटे, 24 चेंडू
एस. श्रीशांत झे. इम्रूल कायेस गो. शकीब अल् हसन 1
13 मिनिटे, 12 चेंडू
अवांतर 13
एकूण 70.5 षटकांत
सर्वबाद 243
बाद क्रम - 9-230
गोलंदाजी -
शफीउल इस्लाम
9-1-41-0
शाहदात हुसेन
18-2-71-5
रूबेल हुसेन
10-0-40-0
शकीब अल् हसन
29.5-10-62-5
महंमदुल्ला
3-0-17-0
महंमद अश्रफुल
1-0-5-0
बांगलादेश - पहिला डाव
तमिम इक्बाल त्रि. गो. झहीर खान 31
81 मिनिटे, 45 चेंडू, सहा चौकार
इम्रूल कायेस पायचीत गो. झहीर खान 23
69 मिनिटे, 46 चेंडू, पाच चौकार
शहरयार नफीस झे. लक्ष्मण गो. इशांत शर्मा 4
महंमद अश्रफुल खेळत आहे 0
रकिबूल हसन खेळत आहे 1
एकूण 17 षटकांत
3 बाद 59
बाद क्रम - 1-53, 2-58, 3-58
गोलंदाजी -
झहीर खान
9-1-32-2
एस. श्रीशांत
3-0-13-0
इशांत शर्मा
5-1-14-1
दुसऱ्या दिवशी 24.5 षटकांचाच खेळ
या कालावधीत 89 धावांत पाच फलंदाज बाद
दोन दिवसांत 97.5 षटकांचाच खेळ
आत्तापर्यंत एकंदर 90.1 षटकांचा खेळ वाया