दहशतवाद आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. तो आपण रोखू शकत नाही. दहशतवाद्यांकडून कोठे आणि का विध्वंस घडविला जाईल, हे आता प्रश्न उरले नाहीत. केवळ कधी हेच आपण विचारू शकतो. मानवी सभ्यता आणि लोकशाहीची सर्वमान्य तत्त्वे जपणाऱ्या आपल्या सारख्या सभ्य समाजाला दहशतवादाशी त्याच स्तरावर जाऊन लढणे शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्या तत्त्वांवर आणि जीवन मूल्यांवर ठाम राहूनच ही लढाई लढावी लागणार आहे.
मुलतत्ववादच कारणीभूतदहशतवादाची सुरवात जरी सहाव्या दशकापासून झाली असली. तरी, गेल्या दोन दशकांत त्याची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. जगभरात त्यांचे थैमान सुरू आहे. आता ही लढाई लष्करी ताकदीच्या जोरावर जिंकता येणार नाही, हे सुद्धा अमेरिकेच्या इराक आणि अफगाणिस्तानातील अपयशाने सिद्ध झाले आहे. या राक्षसाविरोधात लढण्यासाठी जनतेने जागृत होण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने जनसमुदायाला एका सामाईक आणि चांगल्या कारणासाठी चळवळीला उद्युक्त करेल असे नेतृत्वच आता दिसत नाही. त्यामुळे जनमत या विषयावर जागृतही केले जात नाही. मी म्हणतो तेच बरोबर आहे. इतरांनी त्याचे अनुकरण करावे, हा मूलतत्त्ववादच आजच्या युवकांना हातात शस्त्र घेण्यास भाग पाडत आहे. जगभरातील चांगले शिक्षण आणि भौतिक सुखसुविधा अशा तरुणांना हातात शस्त्र घेण्यापासून परावृत्त करू शकत नाहीत, हेही आता जगासमोर आले आहे.
अराजक...आणखी अराजकसाम्यवादी असो अथवा भांडवलशाही कोणतीही विचारधारा एका मर्यादेतच अडकलेली आपल्याला दिसते. साम्यवादी विचारधारेने नागरिकाचे मूलभूत हक्कच त्यांच्याकडून हिरावून घेतले होते. एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून निर्णय घेण्याचे कसलेच अधिकार त्यांच्याकडे नव्हते, या बंदीस्तपणाच्या अगदी विरोधी टोक भांडवलशाही आहे. या व्यवस्थेचा "बळी तो कान पिळी' हाच नियम झाला आहे. तुम्हाला जाहिरातीच्या मोहात गुंतवून तुमच्या खिशातून पैसा काढणे, हेच या व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मूलतत्त्ववाद्यांतही आपसांत संघर्ष आहेत. आपल्या गटांत माणसे ओढण्यासाठी किंवा मीच जास्त कट्टर आहे, हे दाखविण्यासाठी त्यांच्यातच होणारे रक्तरंजित संघर्ष थांबविण्यात त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे सर्वच बाजूनी अराजक आणि आणखी अराजक अशी स्थिती निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्य हिरावण्याचा मार्ग...जगाला भेडसावणारे असंख्य प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. अन्न आणि पाण्याची कमतरता, वातावरणात होत असलेले बदल, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, रोगराई या सारखे प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे आहेत. मानवाच्या कल्याणासाठी या प्रश्नांना भिडण्याऐवजी आपण वेगळ्याच मार्गावर जात आहोत. हजारो वर्षांपूर्वी आमच्या धर्मग्रथांत सांगितलेलेच सत्य, हा आव आणून प्रत्येकजण दुसऱ्याच्या जिवावर उठला आहे आणि खरी गोष्ट म्हणजे सर्वच धर्मग्रंथांनी शांततेने जगण्याचाच संदेश दिला आहे, याचा विसर यांना पडला आहे. आपल्या जगण्यावरच स्वार्थी आणि मतलबी राजकारण्यांनी अतिक्रमण केले आहे. हे सर्व सामरिक नीती आणि संरक्षणाच्या नावाखाली मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे पाहता हे दहशतवादविरोधी युद्ध नाही तर, आपल्या जीवनपद्धतीवर घातलेला घाला आहे. आपले स्वातंत्र्य, इच्छा, आकांक्षा याचे पंख कापण्याचे काम हे वाट चुकलेले तरुण करत आहेत. या तरुणांना काही काळासाठी सत्ता मिळेल, आपली धोरणे राबविता येतील, काही आर्थिक लाभही होईल. पण, एक गोष्ट नक्की आहे की, हे तरुणही त्यांनी ज्यांना विरोध केला त्यांच्याच मार्गावर जात आहेत. इतरांचे स्वातंत्र्य हिरावण्याचा मार्ग..
आळा कसा घालणार?आपल्या स्वातंत्र्यावरील, जीवनशैलीवरील हा हल्ला रोखण्यासाठी आता सामान्य माणसानेच पुढे येण्याची गरज आहे. आपली व्यक्तिगत मते, आवड यांना बाजूला ठेवून दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी उभे ठाकले पाहिजे. आपल्या लोकशाहीचे रक्षणही आपणच केले पाहिजे. ठाम निश्चयाच्या आधारेच आपण या राक्षसी प्रवृत्तीला आळा घालू शकू.