रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 31, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - राज्यातील रेशनिंग दुकानावरील रॉकेलचा काळा बाजार रोखण्यासाठी संबंधित दुकानदारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात येईल. काळा बाजार करणाऱ्या ज्या दुकानदारांचे डिपॉझिट दोन वेळा जप्त करण्यात आले आहे, त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत केली. रेशनिंगवरील धान्य घरपोच सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.
पुणे, नगर, बुलडाणा, सांगली जिल्ह्यातील होत असलेल्या रॉकेलच्या काळाबाजाराचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला. निम्हण सदाशिव पाटील व अन्य सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. अनेक जिल्ह्यात रॉकेलचा काळाबाजार होत असल्याची वस्तुस्थिती मंत्री देशमुख यांनी मान्य केली; परंतु सरकारतर्फे दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. दुकानदारांचे डिपॉझिट जप्त करूनही काळाबाजार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रॉकेलचा काळाबाजार रोखण्याच्या दृष्टीने पुण्याच्या सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी संस्थेने तयार केलेली अत्याधुनिक "जीपीएस' यंत्रणा राज्यात सुरू करण्यात येणार आहे. पुणे विभागात प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी प्रथम रॉकेल टॅंकरमध्ये भरले जाते व शेवटी ज्या दुकानदाराला ते वितरित करण्यात येईल, त्याचे "जीपीएस' यंत्रणेमार्फत ट्रेकिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
राज्यात 55 हजार रेशनिंग दुकाने असून या सर्व दुकानांमध्ये अत्याधुनिक संगणकीय यंत्रणा सुरू करण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याचे सांगून देशमुख म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या नवीन रेशनिंग दुकानांना स्थगिती आहे. ही स्थगिती उठविल्यानंतर नवीन दुकानांना मंजुरी देण्यात येईल, असेही यांनी स्पष्ट केले.