चैत्यभूमी विकास प्राधिकरण स्थापनेस विलंब
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 18, 2010 AT 12:37 AM (IST)
मुंबई - चैत्यभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने इंडिया युनायटेड (इंदू) मिलची जागा केंद्र सरकारकडून मिळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून त्यासाठी चैत्यभूमी प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत देवूनही राज्याच्या मुख्य सचिवानी जीआर काढण्यास विलंब केला आहे. या ऐतिहासिक कामाला गती देण्यासाठी प्राधिकरणाची लवकरात लवकर स्थापना करण्याची मागणी आमदार संजय दत्त यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
इंदू मिलची जागा चैत्यभूमीच्या विकासासाठी संपादित करण्यासाठी राज्याचे नगरविकास खाते तसेच केंद्र सरकारचा वस्त्राद्योग विभाग यांची गेल्या 8 मार्च रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक झाली. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या प्रकरणी लक्ष घातले आहे. केंद्रीय वस्त्राद्योग मंत्री दयानिधी मारन यांच्याशी चर्चा करण्यासाठी तसेच प्राधिकरण स्थापन करण्यासाठी जीआर काढण्यात मुख्य सचिव विलंब लावत असल्याची बाब आमदार दत्त यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. राज्याच्या मुख्य सचिवांनी तत्काळ जीआर काढावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.