ओव्हरलोड मालवाहतुकीला "आरटीओ'चा वरदहस्त
सकाळ वृत्तसेवा
Friday, April 23, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - राज्यातील महामार्गावरून होणाऱ्या ओव्हरलोड मालवाहतुकीमुळे परिवहन खात्याचा दिवसाला 48 लाख रुपये दंड स्वरूपातील महसूल भ्रष्ट आरटीओ अधिकाऱ्यांकडून बुडविला जात आहे. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी केला आहे. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली.
ट्रकमधून होणाऱ्या ओव्हरलोड मालवाहतुकीकडे आरटीओचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने एका तासाला दोन लाख रुपयांचा महसूल बुडतो; तर वर्षाला शासनाचे 175 कोटी रुपये भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून बुडविले जात असल्याचा आरोप बाविस्कर यांनी केला आहे. या प्रश्नी मनसे आमदारांच्या शिष्टमंडळाने बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. धुळे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर मनसेने केलेल्या आंदोलनात आम्ही ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडल्या. त्यांच्याकडून एका तासात दोन लाख रुपयांचा महसूल परिवहन खात्याला मिळवून दिला. जर एका मार्गावर तासाला दोन लाख रुपयांचा महसूल मिळत असेल, तर राज्यातील 16 महामार्गावर गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास 10 हजार करोड रुपयांचा महसूल बुडविला गेला असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी जकात नाक्याचे संगणकीकरण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिष्टमंडळात आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, मंगेश सांगळे, उत्तमराव ढिकले, रमेश पाटील, नितीन भोसले यांचा समावेश होता.