राष्ट्रवादीच्या बंडखोरांना कॉंग्रेसच्या पायघड्या
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 28, 2010 AT 12:15 AM (IST)
मधू कांबळे - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते फोडून आपल्या तंबूत आणण्याची आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी केलेल्या काही आजी-माजी आमदारांनाच आपल्या छावणीत आणण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याने राष्ट्रवादीचे काही नेते दुखावले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही, कॉंग्रेसचे काही मासे आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भविष्यात पक्ष फोडाफोडीवरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये वेगळाच संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील बोईसर येथे 24 एप्रिलला कॉंग्रेसच्या मेळाव्यात शिवसेनेचे माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख उदयबंधू पाटील यांच्यासह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने दुसऱ्या दिवशी 25 एप्रिलला महाड येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचा जाहीर पक्षप्रवेश घडवून आणला. शिवसेनेचे कोकणातील दुसरे एक नेते आणि माजी मंत्री रवींद्र माने यांनीही राष्ट्रवादीची वाट धरली आहे. कॉंग्रेसने मात्र आता, कोकणातीलच काही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आपल्या तंबूत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच 26 मार्चला विधान परिषदेच्या एका जागेसाठी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक झाली. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार व अर्थमंत्री सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांच्याविरोधात माजी आमदार माणिकराव जगताप यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक गाजली. या निवडणुकीत जगताप पराभूत झाले; परंतु निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या जगताप यांना कॉंग्रेसने आपल्या छावणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केल्यामुळे कोकणातील राष्ट्रवादीचे नेते दुखावले आहेत. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आणखी एक माजी आमदार गोटीराम पवार कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. पवार यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार किसन कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते व केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कॉंग्रेसमधून बंडखोरी करून रिंगणात उतरलेले व नंतर भाजपमध्ये जाऊन विधानसभेवर निवडून आलेले नाना पटोले हेही कॉंग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे.
एकंदरीत लोकसभा, विधानसभा व विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना कॉंग्रेसमध्ये येण्यासाठी लाल गालीचा टाकला जात आहे. साहजिकच त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरली आहे. कॉंग्रेस अशा प्रकारे आमच्या विरोधकांनाच प्रवेश देणार असेल, तर आम्ही त्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी कॉंग्रेसला दिला आहे. त्यामुळे भविष्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबरील खडाजंगीमागील गूढ
राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना विश्वासात न घेता, मतदारसंघातील त्यांचे विरोधक व शिवसेनेचे माजी आमदार शंभूराजे देसाई यांच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली होती. त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले होते. त्यावरून मुख्यमंत्री विरुद्ध राष्ट्रवादीचे मंत्री अशी तलवारबाजी झाली होती.