मुंबईतील मोटरमनशी चर्चा करा - गिते
सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, May 01, 2010 AT 12:46 AM (IST)
नवी दिल्ली - मुंबईची "जीवनरेखा' असलेल्या लोकलचे मोटरमन येत्या 3 मेपासून बेमुदत उपोषण करणार असून, लोकल बंद झाल्यास मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी तातडीने मोटरमनच्या संघटनेशी चर्चा करावी, अशी मागणी शिवसेना नेते व खासदार अनंत गिते यांनी लोकसभेत शून्य काळात केली.
मुंबईतील मोटरमन व इतर कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा मुद्दा उपस्थित करून श्री. गिते म्हणाले, की मुंबईत दररोज 65 लाख लोक लोकलने प्रवास करतात. या लोकलचे मोटरमन व कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी येत्या 3 मेपासून बेमुदत उपोषणावर जाण्याचा इशारा दिला आहे. मोटरमनच्या आंदोलनामुळे रेल्वेसेवा विस्कळित होऊन आर्थिक समस्याही निर्माण होतील. त्यामुळे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने या कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी.