गडचिरोलीत वादळी पावसाने लाखो रूपयांचे नुकसान
-
Tuesday, May 04, 2010 AT 12:00 AM (IST)
गडचिरोली - दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून वाहतूक सेवा, वीज, दूरध्वनी, भ्रमणध्वनी तसेच तेंदूपानावर मोठा परिणाम झाला आहे. वीज खांब आणि झाडे कोलमडून पडल्यामुळे अनेक ठीकाणी विजपुरवठा खंडित झाला आहे. गावराणी आंब्यांसह भाजीपाल्याचेही गारपीटामुळे नुकसान झाले आहे.
अहेरी तालुक्यात आलापल्ली येथे शनिवारी (ता. एक) वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात अनेक घरांची पडझड झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. येथील बसस्टॅंड चौक, साईमंदीर, गोंडमोहल्ला, श्रीरामचौक, बजरंग चौक, सॉमील परिसर व भामरागड मार्गावरील वस्तीत अनेक झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले.
साईमंदीराजवळील प्रशांत ठेपाले यांच्या जयसाई किराणा स्टोअर्सच्या वरील सिमेंट पत्रे पडल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली, ही पत्रे शेजारच्या घरावर पडल्यानेही कवेलू फुटून मोठे नुकसान झाले. जि. प. च्या कृषी सभापती प्रिती गोडसेलवार यांचे वाहन क्रीडा संकुलाजवळी झाडाखाली ठेवले होते. वादळामुळे त्यांच्या वाहनावर झाड कोसळल्याने वाहनाचा चेंदामेंदा झाला. तालुक्यात अनेक गावांमध्ये दोन दिवस उलटूनहीनी विद्युत पुरवठा सुरू झापला नाही यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागले. पेरमी परिसतात गारांसह जोरदार पाऊस झाला. परिसरात सतत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला.
तेंदूपानावर परिणाम
अहेरी तालुक्यात अनेक ठिकाणी गारांसह जोरदार पाऊस पडल्याने तेंदूपाने फाटली असून तेंदू व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकतीच तेदू संकलनाला सुरूवात झाली असतानाच पावसामुळे मजुरांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. या शिवाय वादळामुळे गावरानी आंब्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.