
ब्रिजटाऊन - उसळत्या चेंडूंचा सामना करण्याच्या तंत्राचा अभाव फारच निराशा करणारा आहे, अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीने काल वेस्ट इंडीजविरुद्धच्या पराभवानंतर खेद व्यक्त केला आणि या पराभवास फलंदाजांना सर्वस्वी जबाबदार धरले.
इंग्लंडमध्ये झालेल्या गतवेळच्या ट्वेंन्टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीजनेच भारताची ही कमकुवत बाजू उघड केली, त्यानंतर आता प्रत्येक प्रतिस्पर्धी भारताच्या या दुखऱ्या बाजूवर बोट ठेवत आहे. यंदाच्या स्पर्धेतील सुपर एटमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने उसळत्या चेंडूंचा मारा करून भारतीय फलंदाजांचे पानिपत केले. काल वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी असाच मारा करून भारतीय फलंदाजीची त्रेधा उडविली.
कालच्या पराभवानंतर बोलताना धोणी म्हणाला, फलंदाजी ही आमची ताकद आहे. 170 धावांचे लक्ष्य कठीण नव्हते. कालच्या सामन्यात एक अतिरिक्त फलंदाज खेळवून फलंदाजी भक्कम केली होती, परंतु आम्हाला वेस्ट इंडीजच्या वेगवान माऱ्याचा समर्थपणे सामना करता आला नाही. आमची ही कमकुवत बाजू अचानकपणे पुढे आलेली नाही. उपखंडाबाहेर नेहमीच उसळत्या चेंडूंचा सामना करावा लागतो.
उसळत्या चेंडूंचा सामना कसा करायचा याची माहिती असली तरी ट्वेन्टी-20 प्रकारात सातत्याने टाकले जाणारे असे सर्वच चेंडू सोडून देता येत नाहीत आणि जेव्हा धावा होत नाहीत, त्या वेळी दडपण वाढत जाते, असे सांगून धोणी म्हणाला, अशा प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करावा लागणार यासाठी आम्ही तयारी केली होती, परंतु तयार केलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करू शकलो नाही.
कालच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आमच्या फिरकी गोलंदाजांसमोर बहुतेक फलंदाज अडखळत खेळलेले आहेत, इतर संघांच्या तुलनेत आमचीही गोलंदाजी फार वेगळी नाही. आमच्या गोलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत उत्तम मारा करून आम्हाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे, असे सांगताना धोणीने रवींद्र जडेजाचेही समर्थन केले. तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध सोडलेले झेल आम्हाला महागात पडले असे स्पष्ट केले.