सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी वापरलेल्या अपशब्दांनी संघ परिवारामध्ये नाराजीची भावना आहे. बिहारच्या निवडणुका तोंडावर असताना या दोघा नेत्यांवर फेकलेले 'शब्दास्त्र' भाजपवर उलटण्याची चिन्हे आहेत.
गडकरी यांनी दिलगिरी व्यक्त करूनही वाद मिटण्याची शक्यता कमी आहे. उभय पक्षांनी गडकरी यांना थेट न्यायालयात खेचण्याचा निर्धार जाहीर केला असल्याने भाजपला हे प्रकरण संसद तसेच संसदेबाहेर महाग पडेल, अशी धास्ती पक्षातूनच व्यक्त होत आहे.
संसदेत महागाईच्या मुद्द्यावर मुलायमसिंह व लालूप्रसाद यांचे सहकार्य मिळविण्यात विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज व अरुण जेटली यशस्वी झाले होते. त्याच एकीतून यंदाच्या अर्थसंकल्पावरही विरोधकांनी सामूहिक बहिष्कार घातल्याचे अभूतपूर्व दृश्य दिसले होते. कपात प्रस्तावांवर मुलायम व लालूप्रसाद यांनी कॉंग्रेसला मदत केली असली, तरी भाजपचे नेते त्याचा साराच दोष त्यांच्यावर न टाकता "सीबीआय'वर टीका करीत होते. आता मात्र आपल्याच अध्यक्षांनी निर्माण केलेला ताजा वाद न मिटवल्यास संसदेतही भाजपला मुलायमसिंह व लालूप्रसाद यांचे सहकार्य मिळणे कठीण होणार आहे.
गडकरी यांनी काल (ता. 13) चंडीगडच्या सभेत बोलताना सैल भाषेचा वापर केला. लोकसभेत कपात ठरावांवेळी मतदानावर बहिष्कार घालून कॉंग्रेसला मदत करणारे मुलायम व लालूप्रसाद यांना गडकरी यांनी कुत्र्याची उपमा दिल्याचा आरोप होत आहे.
तसेच हे दोन्ही नेते "सीबीआय'ला घाबरतात. हे नेते म्हणजे सोनिया गांधींचे तळवे चाटणारे कुत्री आहेत, असे ते म्हणाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते डॉ. शकील अहमद यांनीही गडकरींचे वक्तव्य धक्कादायक असून, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. गडकरींनी आज दुपारी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. मी माझ्या भाषणात एका म्हणीचा वापर केला. मुलायमसिंह आणि लालूप्रसाद हे ज्येष्ठ नेते असून, त्यांना अवमानित करण्याचा माझा उद्देश नव्हता.
संघ सूत्रांच्या मते, मुलायमसिंह व लालूप्रसाद आणि अंतिमतः सोनिया गांधी यांच्यावर गरळ ओकून काहीही होणार नाही. सोनियांवर यापूर्वी भाजपने अनेकदा तीव्र टीका केली आहे. त्याचा परिणाम उलटाच झाल्याचे सलग दोन निवडणुकांतून दिसले आहे. तेव्हा भाजप अध्यक्षांनी तरी आपल्या वाणीवर संयम ठेवायला हवा, अशी परिवाराची अपेक्षा आहे. गडकरींची सैल वक्तव्ये पाहून दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची आठवण येते, अशी खोचक प्रतिक्रियाही परिवारात व्यक्त होत आहे.
बिहारमधील सत्तेची धास्ती
काही महिन्यांपूर्वी गडकरी यांनी परप्रांतीयांविरुद्ध बोलून संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांचा रोष ओढवून घेतला होता. दिल्लीत तेव्हा गडकरी यांचा पुतळाही जाळण्यात आला होता. भाजप नेतृत्वाने दूरध्वनी केल्यावर शरद यादव शांत झाल्याचे सांगितले जाते. आता गडकरी यांनी नवा बार उडवल्याने परिवाराला बिहारमधील सत्ता टिकण्याचीच धास्ती वाटू लागली आहे. दिल्लीच्या राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी दरवेळी भडक किंवा अशोभनीय भाषाच वापरणे गरजेचे नसते, असे गडकरी यांना संघनेत्यांनी यापूर्वीच सांगितल्याची आठवण करून देण्यात येत आहे.