रेल्वे घातपाताविषयी तीन वेगवेगळ्या कथा
सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, May 29, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये माओवाद्यांनी घडविलेल्या रेल्वे घातपाताविषयी रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय आणि राज्य सरकारकडून वेगवेगळी माहिती मिळाल्याने पत्रकारांवर चक्रावण्याची वेळ आली. दरम्यान, लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेऊन माओवाद्यांशी लढण्याबाबत निमलष्करी जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याच्या संभाव्य योजनेबाबत चर्चा केली.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेल्वे घातपाताची जबाबदारी घेणारी पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलिस ऍट्रॉसिटी (पीसीपीए) ही संघटना बंगालमधील सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशीच घनिष्ठ संबंधित असल्याने या प्रकरणाला पक्षीय वळण मिळण्याची दाट चिन्हे दिसू लागली आहेत. माओवाद्यांनी रुळांवरून "फिश प्लेट्स' उखडून हा घातपात घडविल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, काही वेळातच रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी ममता बॅनर्जी यांच्या निवेदनावर आधारित वेगळीच माहिती पत्रकारांना दिली. माओवाद्यांनी रुळांवर स्फोट घडवून आणला, अशी ही माहिती होती. ममता यांनी तर रेल्वेगाडीच्या चालकाशी आपले बोलणे झाल्याचा व त्यानेच स्फोटाचा आवाज झाल्याचे सांगितल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे बॅनर्जी यांनी या माओवादी घातपाताची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न चालविल्याचे स्पष्ट झाले. लवकरच विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या या राज्यात माओवाद्यांची सातत्याने बाजू घेणाऱ्या बॅनर्जी यांना आजचा घातपात अडचणीचा ठरण्याची शक्यता दिसल्यानेच त्यांनी केंद्राच्या कोर्टात चेंडू ढकलल्याचेही उघड झाले. मात्र, गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी त्यांच्या म्हणण्याला तत्काळ छेद दिला. दुसरीकडे, बंगाल सरकारनेही ममता यांच्या विधानाशी असहमती दर्शवीत स्फोटामुळे नव्हे, तर फिश प्लेट काढून टाकल्याने अपघात झाल्याचे सांगण्यास सुरवात केली. त्यामुळे नॉर्थ ब्लॉकपासून रेल्वे मंत्रालयापर्यंत जमलेले पत्रकार अवाक झाले.
घातपातात 74 निरपराध प्रवाशांचे प्राण गेल्याचे सरकारी प्रसारमाध्यमांपासून सारीच माध्यमे सांगत असताना सायंकाळी रेल्वे मंत्रालयाने मृतांची संख्या 52 आणि जखमी 132 असल्याचे सांगितले! इतका भीषण माओवादी हल्ला घडूनही संबंधित मंत्र्यांना राज्यातील स्वतःच्या राजकारणाचीच चिंता कशी लागलेली आहे, हे पुन्हा समोर आल्याची उघड चर्चा दिल्लीत होती.
चिदंबरम- लष्करप्रमुख चर्चा
गेल्या महिनाभरातील या तिसऱ्या माओवादी घातपाताची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी आज गृहमंत्री चिदंबरम यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली. दाट जंगलांमध्ये दडून बसणाऱ्या व छुपे हल्ले करणाऱ्या माओवाद्यांना तोंड देण्यासाठी कोणती पावले उचलता येतील? निमलष्करी दलाच्या जवानांना त्यासाठी कोणते विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, याची या वेळी चर्चा झाली.
रात्री रेल्वेगाड्या न चालविण्याचा निर्णय
"ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस'वर माओवाद्यांनी हल्ला केल्याने पश्चिम बंगालमधील खडकपूर ते ओरिसातील रावल किल्ला आणि खडकपूर ते आद्रा या स्थानकांदरम्यान रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत कोणतीही गाडी न सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने रात्री उशिरा घेतला. माओवाद्यांनी आजपासून पुकारलेल्या "काळा दिवस' यामुळे पश्चिम बंगाल, ओरिसाबरोबरच नक्षलग्रस्त बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमधूनही लांब पल्ल्याच्या गाड्या न चालविण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करीत आहे.
माओवाद्यांकडून इन्कार
मिदनापूर जिल्ह्यातील घटनेशी माओवाद्यांचा संबंध नसल्याचा दावा माओवादी नेता असित महतो याने केला आहे. माओवाद्यांना बदनाम करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेच (माकप) हे कृत्य केल्याचा आरोप त्याने एका बंगाली वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीत केला आहे.