मनसेचा निर्णय गुलदस्त्यातच
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 09, 2010 AT 12:30 AM (IST)
मुंबई - विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली असून घोडेबाजारही तेजीत आला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या चारही पक्षांनी आपला अतिरिक्त उमेदवार उतरविल्यामुळे दहाव्या जागेसाठी सर्वांचा डोळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 मतांकडे लागून राहिला आहे. परंतु मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे परदेशात असल्यामुळे त्यांचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यात आहे.
मनसेच्या 13 आमदारांपैकी चारही निलंबित आमदारांना मतदानाचा अधिकार असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मनसे नेमकी कोणती भूमिका घेते यावर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. मनसेच्या मतांचा निश्चित निर्णय झालेला नाही. सर्वच पक्षांनी मनसेकडे मतांची मागणी केली आहे. परंतु मनसेने आपली 13 मते कोणाला द्यायची याचा निर्णय घेतलेला नाही. राज ठाकरे परदेशात असले तरीही त्यांच्यासमवेत गेलेले मनसेचे आमदार व प्रतोद नितीन सरदेसाई आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मनसेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक उद्या (ता.9) होणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांनी परदेशातून सूचना दिल्यानंतर त्यांचा निर्णय या बैठकीत कळविण्यात येईल, असे सांगण्यात येते.
मनसेच्या चार आमदारांना मतदानाचा हक्क मिळाला असला तरीही त्यांचे निलंबन मागे घेण्याचा विषय अद्यापही प्रलंबित आहे. हे निलंबन रद्द करण्यासाठी मनसेकडून प्रयत्न करण्यात आले, पण त्यांना दोन्ही कॉंग्रेसकडून आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला आपल्या अतिरिक्त उमेदवाराला विजयी करण्यासाठी मनसेच्या 13 मतांची आवश्यकता आहे. सत्ताधाऱ्यांकडून कुठला प्रस्ताव येईल, त्यावरच मनसेच्या मतांची दिशा ठरणार आहे. भाजपचे धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनही मनसेकडे काही मतांची मागणी झाली आहे. तसेच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारालाही मनसेच्या मतांची आवश्यकता लागणार आहे. शिवसेनेकडून मनसेच्या मतांसाठी प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. परंतु मनसेने अद्यापही आपला निर्णय घेतला नसून, सध्या मनसेकडून मतांच्या बदल्यात भविष्यातील राजकीय समीकरणांचा ताळमेळ सुरू आहे.