
मुंबई - ज्या कॉंग्रेसने सर्वसामान्य जनतेला हैराण केले, महाराष्ट्राची सतत पीछेहाट केली, त्याच कॉंग्रेसपुढे अखेर तुम्ही गुडघे टेकलेत आणि ते जाहीर कबूलही केले. स्वतः शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा हेच तुमचे उद्योग आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला. शिवसेनेच्या नावाने बकबक करण्यापेक्षा स्वतःची लाज वाचवा, असा सल्लाही उद्धव यांनी राज यांना दिला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत राज ठाकरे उघडे पडले आहेत, अशी टीका करीत ज्या अबू आझमींना मारण्याचे नाटक तुम्ही केलेत, त्याच आझमींच्या कळपात आपण सामील झालात. हा कळप तुम्हाला लखलाभ असो. मराठी माणसांशी गद्दारी करून कॉंग्रेसशी हातमिळवणी का केलीत, याचा जाब तुम्हाला जनतेसमोर द्यावा लागेल, असे खडे बोलही उद्धव यांनी सुनावले. यापुढे कॉंग्रेसविरोधात गळा काढण्याचे नाटक राज ठाकरे यांनी करू नये. ज्या पद्धतीने ते कॉंग्रेसच्या घोडेबाजारात सामील झाले व पुन्हा कॉंग्रेसला का विकले गेलो याचे समर्थन केले हे सारेच चित्र किळसवाणे असल्याचा हल्ला उद्धव यांनी चढवला.
एक ना एक दिवस...
मनसेच्या भूमिकेविरोधात सुज्ञ जनतेने जाहीरपणे व इंटरनेटवर राज यांची छी-थू केली आहे. तुम्ही असे का वागलात? हा प्रश्न शिवसेनेचा नव्हे, तर सर्वसामान्य जनतेने विचारला असून त्याचे उत्तर जनतेला देण्याऐवजी शिवसेनेने काय केले याचा पाढा वाचणाऱ्या राज यांनी जनतेच्या प्रश्नांना बगल दिली आहे. मनसेची "धनसे' झाली ही टीकाही जनतेनेच केली आहे. निलंबित आमदारांना पुन्हा विधानसभेत दाखल करण्यासाठी तुम्ही कॉंग्रेसशी हातमिळवणी केलीत; मात्र ज्या कॉंग्रेसने सर्वसामान्य जनतेला हैराण केले, त्यांच्यासमोरच तुम्ही गुडघे टेकलेत, अशा शब्दांत राज यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. ज्या मराठी माणसांसाठी लढत असल्याची बतावणी तुम्ही करता त्यांच्याशी गद्दारी करून कॉंग्रेससोबत का गेलात, याचे एक ना एक दिवस जनतेला उत्तर द्यावेच लागेल, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
Follow
Us on
Twitter