महाराष्ट्राला दुहीच्या शापातून मुक्त करा
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 22, 2010 AT 12:45 AM (IST)
मुंबई - महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी माणसाने ठाकरे यांनाच मते दिली; पण ती विभागली गेली. मराठी माणसाने कधीही प्रतारणा केली नाही व करणारही नाही. त्यामुळे मोठ्या मनाने शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमाखातर तुम्हा दोघाबंधूंचे नेतृत्व आम्ही स्वीकारले आहे. या मराठी माणसांचा मान ठेवून उद्धव व राज यांनी पुन्हा एकत्र यावे व मराठेशाहीला दुहीच्या शापातून कायमच मुक्त करावे, असे आवाहन काल एका मेळाव्यात करण्यात आले.
'माझी चळवळ मी महाराष्ट्राचा' या मोहिमेअंतर्गत उद्धव व राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, यासाठी मेळावा काल (ता. 20) झाला. ज्येष्ठ शिवसैनिक मधुकर वळंजू यांच्यासह काका सावंत, अरविंद पावसकर, दीपक भोसले, योगेंद्र चेंबूरकर, प्रीतम मंत्री व प्रकाश कानडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या मोहिमेची मुहूर्तमेढ 16 मे रोजी रोवण्यात आली होती. आता सध्या "एसएमएस'च्या माध्यमातून जनसंपर्क साधण्यात येणार असून या मोहिमेची एक वेबसाइट स्थापन करणार असल्याची माहितीही श्री. वळंजू यांनी दिली.
महापालिकेच्या 2012 साली होणाऱ्या निवडणुकांच्या अगोदर हे ऐक्य घडायलाच हवे, या निर्धाराने हे कार्य पुढे रेटायचे आहे. त्या निर्धाराने आम्ही आपल्या साथीने जोमाने कामाला लागणार आहोत, असे सांगतानाच ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेली चळवळ जेवढी महत्त्वाची होती, तेवढीच ही चळवळही आहे. कारण महाराष्ट्र अभंग राहिला, तरच तुमचे आमचे मराठीपण टिकणार आहे. विदर्भ व मुंबईचे राज्य हिंदी भाषिक जाहीर करण्यासही दिल्लीश्वर मंडळी कमी करणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.