युतीच्या भांडणात कॉंग्रेस हात धुवून घेणार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 24, 2010 AT 12:30 AM (IST)
मुंबई - औरंगाबाद महानगपालिकेतील शिवसेना व भाजपमधील भांडणात कॉंग्रेसने हात धुवून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना व भाजपमध्ये माऱ्यामाऱ्या सुरू झाल्या आहेत, अशा परिस्थितीत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारला असलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे स्थानिक नेते व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपने युती करून निवडणुका लढविल्या व बहुमताच्या जवळपास जागा जिंकल्या. अपक्षांच्या मदतीने युतीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही कॉंग्रेसला मात्र निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. आता युतीतच हमरीतुमरी सुरू झाल्याने कॉंग्रेसने त्याचा फायदा उठविण्याचे ठरविले आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीवरून शिवसेना व भाजप यांच्यात राडा सुरू झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विकास जैन यांचा भाजपचे राजू शिंदे यांनी कॉंग्रेसच्या मदतीने पराभव केल्याने युतीत बेबनाव निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात हंगामा केला. त्यामुळे भाजपही दुखावला आहे. भाजपनेही शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत शिवसेनेला काय प्रत्युत्तर द्यायचे ते ठरवू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. युतीतील हा वाद मिटण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.
कॉंग्रेसने मात्र युतीतील भांडणाचा लाभ उठविण्याचे ठरविले आहे. परदेशातून मुख्यमंत्री येताच अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली व थेट औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली. पालिका आयुक्तांकडून अहवाल मागवून घ्यावा व त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचे सत्तार यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत सुरू झालेल्या राजकीय वादाला आता वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत.
|
|