मुंबईकरांची ससेहोलपट
-
Thursday, June 24, 2010 AT 12:15 AM (IST)
योगेश पवार - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - महसूलमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने टॅक्सी बंद करण्यासाठी शहरात केलेली दंडेली, कामगारनेते शरद राव व टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष ए. एल. क्वाड्रोस यांनी दुसऱ्याच्या काठीने साप मारण्याची भूमिका घेत अघोषितरीत्या पुकारलेला बंद आणि दुप्पट-चौप्पट भाडे आकारून टॅक्सीवाल्यांनी प्रवाशांची केलेली लूट यामुळे आजही मुंबईकरांच्या हालाला पारावर उरला नव्हता.
टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी, या मागणीसाठी शहरातील विविध टॅक्सीमालक-चालक संघटनांनी सरकारशी बोलणी सुरू केली आहेत. मात्र, या साऱ्या वाटाघाटीच्या प्रक्रियेत नसलेल्या स्वाभिमान संघटनेने आजही दादागिरीच्या बळावर टॅक्सी सेवा बंद पाडल्याचे चित्र शहरात होते. स्वाभिमान टॅक्सी, रिक्षा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शहरात सकाळी सुरू असलेली टॅक्सी सेवा बंद पाडली. त्यामुळे भायखळा, दादर, लालबाग, सीएसटी, चर्चगेट, कुलाबा, मुंबई सेंट्रल या भागांत टॅक्सी धावत नव्हत्या; तर दुसरीकडे स्वाभिमान संघटनेच्या काठीने शरद राव व ए. एल. क्वाड्रोस यांनी भाडेवाढीचा साप मारण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही नेत्यांच्या ताब्यात शहरातील 90 टक्के रिक्षा, टॅक्सीचालक-मालक असताना, "स्वाभिमान'च्या दादागिरीला घाबरून टॅक्सीवाले दडून कसे बसले? क्वाड्रोस व शरद राव स्वाभिमान संघटनेपुढे खरोखरच हतबल झाले होते काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. खरे तर "स्वाभिमान'च्या या दंडेलीला या नेत्यांनीही अघोषित पाठिंबा देत टॅक्सी सेवा बंद ठेवून, भाडेवाढीच्या बैठकीत सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला आम्ही लोकांना त्रास देणार नाही, "स्वाभिमान'चे लोक गाड्यांचे नुकसान करतात म्हणून त्या बंद ठेवतो, असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला टॅक्सीचा अघोषित संप करून रुग्ण, लाखो मुंबईकर प्रवाशांना वेठीस धरायचे ही एक खेळी असल्याचे बोलले जात आहे; शिवाय त्याचे खापर 'स्वाभिमान'च्या माथी फुटत असल्याने हे नेते आपोआपच नामानिराळे राहिले आहेत.
या साऱ्या राजकीय कुरघोडीच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत सामान्य मुंबईकर पिचला आहे. टॅक्सीवाल्यांनी गाड्यांवर हल्ला होईल, नुकसान होईल, असे सांगत गाड्या बंद ठेवल्यामुळे दोन दिवस दक्षिण मुंबईतील प्रवाशांची ससेहोलपट झाली आहे. आज 'बेस्ट' बसेससाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एखाददुसरा टॅक्सीवाला भाडे घ्यायला तयार झाला, तर पडलेल्या मीटरपेक्षा दुप्पट, चौप्पट पैसे मागून लोकांच्या असहायतेचा फायदा उठवीत असल्याचे चित्र आज शहरात दिसत होते. टॅक्सी युनियनच्या या दंडेलीविरोधात नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत असून, सरकार या अघोषित संपाविरोधात काय कारवाई करणार, असा सवाल मुंबईकर करीत आहेत.