नवी दिल्ली - जूनमध्ये सरासरीपेक्षा 16 टक्के कमी पाऊस पडल्याची माहिती गुरुवारी वेधशाळेने दिली. देशातील सात विभागीय वेधशाळेकडून आलेल्या अहवालानुसार 1995 नंतर प्रथमच जूनमध्ये इतक्या कमी प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जूनमधील पावसाने सर्वांची निराशा केली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि ही समाधानाची बाब आहे, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्याने सांगितले. भारतात सरासरीपेक्षा 16 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद झालेली असताना दक्षिण भारत आणि हिमालयाच्या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली.
आंध्र किनारपट्टीचा भाग, मध्य महाराष्ट्र, रायलसीमा, तमिळनाडू, पॉंडेचरी, पश्चिम राजस्थानात समाधानकारक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात 184. 3 मिलिमीटर पाऊस नोंदला असून तो सरासरीपेक्षा 37 टक्के अधिक आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्येही पावसाने सरासरी ओलांडली आहे. हिमाचलमध्ये 126 मिलिमीटर तर जम्मू काश्मीरमध्ये 90.9 मिलिमीटर पाऊस पडला. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, दक्षिण-मध्य कर्नाटक, उत्तर मध्य कर्नाटकमध्ये सर्वसाधारण पाऊस झाला. कोकण आणि गोवा, मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट्र, दीव आणि कच्छ भागात सरासरीइतका पडला.
कोकण 670 मिलिमीटर, मराठवाडा 118.3 मिलिमीटर, विदर्भ 143.2 मिलिमीटर पाऊस पडला. पश्चिम बंगाल, आसाम, अंदमान निकोबारमध्येही सर्वसाधारण पाऊस पडला. उत्तरेत केवळ पंजाबमध्ये 34.5 मिलिमीटर पाऊस पडला. हा सरासरीपेक्षा 15 टक्के पाऊस कमीच आहे. भारतात 60 टक्के पाण्याचा वापर शेतीसाठी होतो; परंतु यंदा मॉन्सूनचा जोर कमी राहिल्याने मध्य भारतात सोयाबीनची लागवड मंदावली आहे. पाऊस लवकर पडला नाही तर पंजाब आणि हरियानातही भाताच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्याने वर्तविली.
Follow
Us on
Twitter